मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान दोन्ही संघांमध्ये २६ डिसेंबर रोजी 'बॉक्सिंग डे टेस्ट' सुरु होणार असून यात तीन वन-डे आणि तीन टेस्ट सामन्यांच्या मालिका होणार आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन विराट कोहली ऐवजी राहुल द्रविडने पत्रकारांना संबोधित केल्याचे दिसले.
"कर्णधार निवडणे हे काही माझं काम नाही, ते निवड समितीचं काम आहे. आमचं संपूर्ण लक्ष हे कसोटी मालिकेवर आहे. मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्याही एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. यात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते", असे द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले.
विराट कोहलीवरुन बीसीसीआयमध्ये गेले काही दिवस बराच वाद चालला होता. बीसीसीआयने याआधी विराटकडून टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली होती. बीसीसीआय बोर्डने कारवाईच्या ४८ तास आधीच विराटला कर्णधारपद सोडण्याचे अल्टिमेटम दिले होते. परंतु विराटकडून त्याचे उत्तर न मिळाल्याने बीसीसीआय बोर्डने कारवाई केली; असे त्यावेळी सांगण्यात आले.
"विराटकडून फक्त एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्याला टी-२० सामन्यांमधील कर्णधारपद सोडायला सांगितले नव्हते", असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. हे दावे विराटने दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेटाळून लावले. त्यामुळे बीसीसीआय बोर्डसुद्धा आता याबाबतीत सावध झाले असल्याचे दिसत आहे.