मुंबई : एकापाठोपाठ एक परीक्षा रद्द करण्याचा धडाका लावलेल्या महाविकास आघाडी (मविआ) सरकारचा समाचार घेताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी “हा सरकारचा ‘गिनीज बुक’ विक्रम आहे,” असे म्हटले आहे. “परीक्षांपासून आरक्षण आणि प्रकल्पही रद्द होत आहेत, हे ‘रद्दबातल’ सरकार आहे आणि त्याबाबतीत सरकारची विक्रमी कामगिरी झाली आहे,” असेही लाड यांनी म्हटले आहे. आरोग्य खात्यातील भरती परीक्षांच्या घोळावर बोलताना रविवार, दि. १२ डिसेंबर रोजी लाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“हे सरकारच ‘रद्दबातल’ सरकार आहे. सर्वसामान्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम हे सरकार करते आहे. त्यांच्या सुखदुःखाची कोणतीच तमा या सरकारला उरलेली नाही. आत्तापर्यंत आरोग्य विभाग, ‘म्हाडा’भरती परीक्षांपासून ‘एमपीएससी’ अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे. ज्या परीक्षा घेतल्या गेल्या त्यांच्यात सावळा गोंधळ घातला गेला. हा तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. तीच परिस्थिती मराठा, ओबीसी समाजांच्या आरक्षणाबाबत आहे. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. हे पाप मविआ सरकारचे आहे. या सर्वांवर कडी म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत, असेही यावेळी बोलताना लाड यांनी म्हटले.