मुंबई : कोरोनामुळे झालेले मृत्यू प्रशासन लपवत असल्याच्या निषेधार्थ बेस्ट कामगारांतर्फे महिनाभर मूक निदर्शने करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा बजावताना बेस्टच्या ५४ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून बेस्ट प्रशासन म्हणते फक्त ९ कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रशासन ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे. कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कामगारांकडे बेस्ट प्रशासनाचे लक्ष नाही. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून (११ जून) १३ जुलैपर्यंत कामगार मूक निदर्शने करणार आहेत.
बेस्टच्या ७०० कामगारांना क्वारंटाईन केले आहे. ३५० पेक्षा अधिक कामगार कोरोनाचा बाधित आहेत. २०० कामगारांनी कोरोनावर मत केली आहे. मात्र कामगारांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे लागेल यासाठी बेस्ट प्रशासन मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे. कामगार मुंबईबाहेर पालघर, उरण, खोपोली आदी भागात राहात आहेत. काही कामगार गावी अडकले आहेत. त्यांना कामावर हजर राहण्यासाठी साधन नाही. कामगारांना ५० लाखांचे विमाकवच द्यावे, वारसाला नोकरी द्यावी आणि गैरहजर राहणाऱ्या कामगारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशी मागणी कृती समितीने केली आहे. कामगारांना कोरोनाच्या काळात सुरक्षेची साधने पुरवा, कामगारांच्या कुटुंबांची कोरोनाचा चाचणी करा, प्रत्येक आगारात २० बेडचे क्वारंटाईन सेंटवर सुरू करा, वडाळा किंवा दिंडोशी या भागात कोरोनाचे तात्पुरते स्वतंत्र रुगणालय उभे करा आदी मागण्या कृती समितीने केल्या आहेत. कामगारांच्या मागण्यांसाठी ही मूक निदर्शने असतील अशी माहिती कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली.