‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती जगात ठायी ठायी निर्माण झाली आहे. कारण, अर्थातच कोरोना! जागतिक संकटाने आता आपल्या भोवती पाश आवळायला सुरुवात केली आहे.
आपल्या हितासाठी प्रशासन कर्मचारी वर्ग, पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका झटत आहेत. आपण घरात सुरक्षित आहोत आणि ते जीवाची पर्वा न करता सेवा करत आहेत. लहानपणी एका जत्रेत मी ‘मौत का कुँआ’ आणि तो थरार अनुभवला होता. आज जेव्हा डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, पोलीस आपल्यासाठी बाहेर झटत आहेत. त्यांच्यासाठी तो ‘मौत का कुँआ’च आहे. पण, जिगरबाज, नीडर, सेवाभावापुढे कोणताही शत्रू गुडघे टेकतो. आपल्या जीवितासाठी आणि आरोग्यासाठी हे सर्व प्राणपणाने लढतात. मग आपण त्यांना साथ द्यायला नको का? त्यांचं मनोधैर्य आपल्या कृतीतून वाढवायला हवे. वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष द्यायला हवे़ सतत हात धुणे आणि आजारी पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. वैद्यकीय सेवेवर ताण पडणार नाही, याचा दूरद़ृष्टीने विचार करावा.
आपल्या सुरक्षेसाठी काही निर्बंध असले तरी विशिष्ट काळात आपण एकाच व्यक्तीने घराबाहेर पडून भाजी, फळे, दूध, औषध, किराणा इत्यादी सामान आणायला हरकत नसली तरी अनावश्यक बाहेर हिंडू नये. मराठीत म्हण आहे, ‘विषाची परीक्षा घेऊ नये.’ कोरोना कुणा एकाचा नाही, तो सामूहिक बळी घेतोय, ही साखळी आपल्याला तोडायला हवी. ‘सोशल डिस्टन्सिंग’ ही संकल्पना काही काळासाठी अपरिहार्य आहे. आपल्याला माहीत नाही, नेमका कोरोना कुणाला झाला आहे? अनेक ‘पॉझिटिव्ह’ केसेसमध्ये सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, सगळं नॉर्मल होतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप काळजी घ्यायला हवी. काय करायला हवं आणि काय नको हे सर्वांना चांगलंच माहीत आहे़ तरीसुद्धा काही खबरदारीच्या उपाययोजना- तुम्ही घरात असलात तरी दूध, धान्य, भाज्या घेताना विक्रेत्याच्या संपर्कात येऊ शकता. कदाचित अशी व्यक्ती कोरोनाबाधित असेल तर? विक्रेत्याने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळल्या तरी अशा माध्यमातून कोरोना पसरु शकतो. केवळ कोरोना आहे म्हणूनच नव्हे, तर यापुढेही आपण अशा प्रतिबंधात्मक सवयी हाताळू शकतो़
घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, सुती चौपदरी ओढणी बांधून जावे. बाहेरुन आल्यावर कपडे धुवायला टाकावेत. हातपाय स्वच्छ धुवावेत. आणलेल्या सर्व भाज्या कोमट पाण्यात भिजवून ठेवाव्यात. पाण्यात मीठ टाकून फळे, भाज्या काही तास ठेवाव्यात. भाजीची पिशवी कडक उन्हात शक्यतो बाहेरच ठेवावी. भाजी घेताना दूरुनच हात न लावता थेट पिशवीत टाकण्यास सांगावे. (त्याआधी कोणी हाताळल्यास विषाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको.) या काळात सॅलड वगैरे बनवून खाऊ नये़ कच्चं अन्न खाणं टाळावे, शिजवूनच खावे. दूधाची पिशवी बाहेरुन चांगली धुवून घ्यावी. किराणा माल उन्हात बाहेरच ठेवावा. कडक उन्हात काही तास बाहेर ठेवलेलं धान्य त्यानंतर वापरावे. स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोर पाळावेत आणि दुसर्यानेही ते पाळावेत यासाठी आग्रही राहावे. नखे कापावीत, स्वच्छ राहावे, स्वच्छ दिसावे, मन प्रसन्न राहण्यासाठी शरीर स्वच्छ ठेवावे.
जीवनात समस्यांचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो. कोरोना ही जागतिक समस्या आहे़ माझ्या आजवरच्या आयुष्यात अनेक चढउतार मी अनुभवले आहेत़ देशात आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो. तेही दिवस आम्ही अनुभवले. अर्थात, त्यावेळी ज्येष्ठ मंडळी होती. त्यामुळे मन निर्धास्त होते. आज आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की, अनेक अद़ृश्य जबाबदार्या आहेत. एक सर्वसामान्य व्यक्ती, एक कुटुंबप्रमुख आणि एक उद्योजक म्हणून मी ही कोरोनाचा सामना करत आहे़ कोरोना जात-पात, धर्म, लिंग, शिक्षण, सोशल स्टेट्स पाहत नाही. त्याच्या कचाट्यातून वाचायचे असेल तर एकमेकांच्या संपर्कात येऊ नका. घरातदेखील वेगवेगळ्या वयोगटाची मंडळी असतात. थोडं अंतर राखून राहायला शिका. कारण, तेच हितावह आहे. कोरोनाने जी हानी केली, ती क्वचितच अन्य कोणत्या गोष्टीने झाली नसेल़ जगापुढे उभा राहिलेला ’यक्षप्रश्न’ लवकरच सुटेल़ त्यासाठी सामूहिक सहकार्याची आवश्यकता आहे़ आपल्या मनाला आवर घाला आणि बाहेर पडणे टाळा. अनेक सकारात्मक गोष्टींत आपण मन रमवू शकता़ छंद जोपासा. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
भविष्यात आपली एकजूटही देशाची एकजूट असेल आणि जगभरात भारतीय संस्कृतीला मानवंदना मिळेल. याचे कारण इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत. आपले संस्कार/आपली संस्कृती भिन्न आहे. त्यामुळे मनोबलावर आपली पडझड थांबणार आहे. आपण अत्यंत चिवट आणि सहनशील संयमी आहोत. प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची वृत्ती आपल्याला कोरोना युद्धात नक्कीच विजय प्राप्त करुन देईल, यात अजिबात संदेह नाही़.
कृपया घरातच राहा निर्भय राहा!
- संजीव पेंढरकर