आयसीएमआरकडून सर्व राज्यांना आदेश
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी प्राथमिक स्वरुपात घेण्यात येत असलेल्या रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याची तक्रार आयसीएमआरकडे आली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राज्यांनी पुढील दोन दिवस रॅपीड टेस्ट करु नये, असे आयसीएमआरने म्हटले आहे. दोन दिवसात आयसीएमआरचे पथक यासंदर्भात तपासणी करेल, त्यानंतर नवी अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
आयसीएमआरकडून आठ पथके फिल्डवर पाठवण्यात येणार आहेत. एका राज्याने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्यण घेण्यात आला आहे. रॅपीड टेस्टमुळे प्राथमिक चाचणीतच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे की नाही समजू शकते. यासाठी रक्त घेतल्यानंतर या रक्ताची टेस्ट केली जाते. अवघ्या पाच मिनिटात आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याच्या माध्यमातून कोरोनासंदर्भातील प्राथमिक अंदाज बांधणे शक्य आहे. पण या टेस्टमध्ये योग्य निष्कर्ष समोर येत नसल्याची तक्रार एका राजस्थान सरकारकडून करण्यात आली आहे.
त्यामुळे आयसीएमआरने तूर्तास याचा वापर करु नका, असे म्हटले आहे. राजस्थानने रॅपीड टेस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले असून टेस्ट करणेही बंद केले आहे. आतापर्यंत देशात ४ लाख ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास ३३ हजार चाचण्या या सोमवारी करण्यात आल्याची माहितीही एमआरसीकडून देण्यात आली आहे.