राष्ट्र सेवा समितीच्या बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्गाचा दिमाखदार समारोप

    04-Mar-2020
Total Views | 87
vivek_1  H x W:



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती


खानिवडे : विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीमार्फत ‘एक कदम ग्रामीण रोजगार कि ओर’ या कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांना घर सांभाळून रोजगार मिळावा म्हणून बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मागील नऊ वर्षांपासून देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे चालू वर्षी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. बुधवारी दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता झालेल्या या समारोप कार्यक्रमाच्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तसेच लेखक रमेश पतंगे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष तथा ‘सा.विवेक’आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे साप्ताहिकाचे प्रबंध संपादक व समितीचे संचालक दिलीप करंबेळकर, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक तथा समितीचे संचालक किरण शेलार, संचालक प्रदीप गुप्ता व समितीचे संचालक मंडळ, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समितीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर पालघर तालुक्यातील हलोली बोट गावच्या महिला वनवासी भगिनींनी पालघर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेले वारली नृत्य म्हणजेच तारपा नृत्य सादर केले. यानंतर समितीच्या सरस्वती विद्यामंदिराच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रकल्पाची माहिती समितीचे संचालक दिलीप करंबेळकर यांनी दिली. त्यानंतर बांबू हस्तकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३६ महिलांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्र सेवा समितीच्या ग्रामविकास कार्याचा गौरव करताना देशात चाललेल्या देशविरोधक कृत्याचा समाचार घेतला, तर सध्याच्या केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माहितीसह गावासाठी व एकूणच देशासाठी गोवंश किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले.


यावेळी ‘विवेक पर्यावरण समिती’चे कार्यवाह उमेश गुप्ता यांना राज्यपालांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या सैनिकी वनामध्ये लावण्यासाठी एका वृक्षाचे रोपटे दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक मंदार भानुशे यांनी तर व्यवस्थापक लुकेश बंड यांनी आभारप्रदर्शन केले. विवेक सेंटरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाकरिता पालघर जिल्ह्यातील वनवासी आणि गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘विवेक’ या संस्थेने पुढाकार घेतला असून अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्याकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करण्यात येत आहेत. वनवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्‍या विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक वस्तू राष्ट्रपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पुणे येथील राजभवनात नुकत्याच भेटदेखील देण्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले होते. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्दल विवेक सेंटरच्या कार्याचेही कौतुक केले होते. पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींमार्फत तयार करणार्‍या वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही केले होते.


विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर ही सामाजिक संस्था मागील ९ वर्षांपासून वनवासी महिलांना रोजगार प्राप्ती व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात कार्य करत आहे. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत. त्यात ट्रे, आकाशकंदील, मोबाईल होल्डर, राख्या, फ्रूट बास्केट, पेपरवेट, टी कोस्टर इत्यादींसारख्या आकर्षक वस्तूंची निर्मिती होत आहे. सदर उत्पादने ही उच्च प्रतीची व दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121