मुंबई : 'महाविकास आघाडी सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी हे फक्त बुजगावणे असल्याची राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका इतर मंत्र्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. यावर 'सरकारची कर्जमाफी बच्चू कडू यांना बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे,' असा इशाराच राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री बच्चू कडूंना दिला आहे.
बँकांनी शेतकरी कर्जमाफीचा हिशेब करताना तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी याबाबतचा अहवालच सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला. काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीय बँकांचाही या सावळ्या गोंधळात सहभाग असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
‘शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. पण बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली. मुद्दल आणि व्याज असे मिळून बँकेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड आहे,’ असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक असणाऱ्या बच्चू कडूंनी स्वतः सहभागी असलेल्या सरकारवरही ताशेरे ओढण्यात कसर सोडली नाही. शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, ते अगणित आहे. त्यामुळे दोन लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी हे केवळ बुजगावणे असल्याचे बच्चू कडू म्हणाले होते. पण कर्जमाफीचा हा पहिला टप्पा असून मराठवाडा, विदर्भातील ८० टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडे पैसा येईल तशी आणखी कर्जमाफी केली जाईल,असे प्रत्युत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले.