नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे काही देशांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या देशात वाढू नये म्हणून सीमा बंद केल्या आहेत. यामध्ये इराक व इराणसह तेथील अन्य देशांचा समावेश आहे. यामुळे ६००हून अधिक भारतीय इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ भाविकांचा समावेश आहे.
सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमधील ४४ भाविक तेहरानमध्ये अडकले
इराणमध्ये धार्मिक तीर्थयात्रेला गेलेले जवळपास २ हजार मुस्लीम भाविक तेहरानजवळ अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ भाविकांचा समावेश आहे. या प्रवाशांची तेथून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड सुरु आहे. भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणमधील विमानांना भारतात उतरण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक मागील ८ दिवसांपासून तेहरान परिसरात अडकून पडले आहेत. अकलूज, सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागातील ४४ भाविक कोल्हापूर येथील साद ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे धार्मिक यात्रेसाठी गेले होते.