कृषी कायद्यांवरून शेतकऱ्याची दिशाभूल : फडणवीस

    25-Dec-2020
Total Views | 66

devendra fadnavis_1 



पुणे :
राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही.शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागले.ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. “मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.



“मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनीअभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.





“शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी, मोदी सरकार कायम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलं आहे. आमचं सरकार असतानाही (फडणवीस सरकार) आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली. मात्र ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही. कुठं गेला सरकारचा वादा?”, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला झोपडून काढले.


'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला,' अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा समाचार घेतला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121