वाढवण बंदरात रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपूत्रांना संधी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    16-Jun-2025
Total Views | 11


पालघर :
वाढवण बंदर हे या जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आणि देशाचे चित्र बदलणार आहे. हे बंदर १० लाख रोजगार तयार करणार आहे. या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपूत्रांना फायदा व्हावा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सोमवार, १६ जून रोजी पालघर येथील दुर्वेस गावातील शाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पालघर जिल्ह्यातील दुर्वेस गावातील शाळेतील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. विदर्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे समजून आणि शिकून घेत आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचा सरावदेखील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असता शाळेत अतिशय चांगले शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले."


"सर्व मुलांना गणवेश असो किंवा मध्यान्ह भोजन असो अशा सर्व प्रकारचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो. आज शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री, प्रमुख नेते आणि आमदार शाळेत असा कार्यक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्येसुद्धा शिक्षणाप्रति गोडवा तयार व्हावा," असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी पूल दुर्घटनेतून शिकवण घेणे गरजेचे!

"जिल्हाधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक आहे अशी घोषणा केली होती. गावकऱ्यांनीसुद्धा हा पूल धोकादायक असल्याची तिथे पाटी लावली होती. दुर्दैवाने तिथे पर्यटक आले. अनेकदा अशा गोष्टींकडे आपण फार लक्ष देत नाही. त्यामुळे यातून भविष्यासाठी शिकण्याची गोष्टी आहे. काल मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, अशा धोकादायक ५०० जागा आहेत जिथे पर्यटक जातात. तिथल्या सौंदर्यामुळे लोक तिथे जातात पण त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर संजय राऊतांनी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, "काही लोक देशाच्या सेनेवर, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपांचे पडले असून अशा लोकांना उत्तर द्यायला मी बसलेलो नाही," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121