नवी दिल्ली: दिल्ली येथे सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस नेत्यांनी कृषी कायद्याला विरोध दर्शवला. यासाठी राष्ट्रपतींना तब्बल २ कोटी स्वाक्षऱ्या असणारे पत्र दिले गेले. परंतु दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांच्या समवेत केवळ दोन नेत्यांना राष्ट्रपती भवनात जाण्याची परवानगी मिळाली.
मोर्चाला परवानगी नसल्याने अनेक कॉंग्रेस नेते '१० जनपथ'च्या बाहेर धरणेवर बसले. दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस कार्यालयाभोवती कलम १४४ लागू केला. याविषयी प्रियांका गांधी यांनी "आम्ही मागे हटणार नाही" अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली.
बहुचर्चित अशा तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरूद्ध देशव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून कॉंग्रेसने २ कोटी स्वाक्षर्या गोळा केल्या आहेत. राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकरी, शेतमजूर आणि इतर भागधारकांच्या स्वाक्षर्यांचा समावेश आहे. गेल्या २९ दिवसांपासून हजारो शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत व कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकर्यांशी केलेल्या सर्व चर्चा असफल ठरल्या आहेत.