अब्दुल्ला आणि मुफ्ती काश्मीरचे लुटारू…
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांचा घणाघात
नवी दिल्ली, पार्थ कपोले : अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबाने गेली ७० वर्षे गोरगरिब काश्मीरी जनतेच्या जमिनी लुटल्या आणि देशात – परदेशात कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली. काश्मीरी जनतेला कलम ३७० आणि भाजपची कायम भिती दाखविली. मात्र, आता त्यांचे काळे कारनामे उजेडात आले असून आता काश्मीरी जनताच त्यांचा हिशेब करणार आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू – काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
जम्मू – काश्मीरमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार ‘रोशनी’ जमिन घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सरकारी जमीनींवर अनधिकृत कब्जा केलेल्यांनाच कवडीमोल दरात त्या जमिनींची कायमस्वरूपी मालकी देणे आणि त्यातून प्राप्त महसुलातून राज्यात उर्जा प्रकल्प उभे करणे, अशी योजना काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले असून आता यामध्ये जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख आणि ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह काँग्रेसचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.
सर्व जमिन ताब्यात घेतली जाणार- मनोज सिन्हा, नायब राज्यपाल
घोटाळ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत. प्रभावशाली लोकांनी सार्वजनिक संपत्तीची लूट करण्याचे उदाहरण म्हणजे हा घोटाळा आहे. उच्च न्यायालयाचा त्याविषयीचा आदेश हा डोळे उघडणारा असून जमिनीचे वाटप रद्द करण्याचे आणि जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. या आदेशाची एका महिन्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.