मुंबई : बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. २२वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रियकराने केला होता. या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल १२ तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात तडफडत होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या घटनेसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हंटले आहे. तसेच, याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. ''एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, १२ तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी.'', अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील २२ वर्षीय तरुणी शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले, काही वेळाने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत सावित्रा ४८ टक्के भाजली होती. दुर्दैवी म्हणजे, पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी २ वाजेपर्यंत तडफडत होती. काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. पण, अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८टक्के शरीर भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.