मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीला विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण मिळते आहे. चेंबूर परिसरात बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात बसचालक जखमी झाला आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत इस्टर्न एक्सप्रेस हायवे रोकण्याचा प्रयत्न केला. तसेच घाटकोपर आणि अंधेरीतील स्थानिकांनी रस्त्यावर उतरत याविरोधात निदर्शने केली.
औरंगाबादमध्येही या बंदला हिंसक वळण मिळाले आहे. वाळूजला जाणाऱ्या सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. यावेळी बसची काच फुटली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच काही लोक बंदला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी केली.
वंचितने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जनजीवन सुरळीत असून काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. अकोला, औरंगाबाद, सोलापूर, हिंगोली याठिकाणी बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. इंदापूरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदला कुठेही गालबोट लागू नये याकरिता महाराष्ट्र पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.