मुंबई : सीबीएसई बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डाने परीक्षा लवकर घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या २८ दिवसांमध्ये परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली.
८८.७ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण
८८.७ टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण ७९.५ टक्के इतके आहे. यावर्षी १० विभागांत सीबीएसईची परीक्षा झाली होती. पुढील वर्षी ती १६ विभागांमध्ये घेता येऊ शकते, असे बोर्डाने सांगितले आहे. यंदा त्रिवेंद्रम विभागाने परिक्षेत बाजी मारली. या विभागातले तब्बल ९८.२ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या ९२.३ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले, तर ९१.७८ टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
हंसिका शुक्ला, करिश्मा अरोरा प्रथम
हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले. सीबीएसईचा निकाल गुरुवारी जाहीर होणार असल्याची माहिती विद्यार्थी-पालकांना नव्हती. सीबीएसईचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अचानक आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यापूर्वी सीबीएसईचे निकाल विविध टप्प्यांमध्ये जाहीर व्हायचे. मात्र यंदा सर्व विभागांचे निकाल सीबीएसईकडून एकाचवेळी जाहीर करण्यात आले. जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat