
मुंबई : विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. फडणवीस यांनी सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हितासाठी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळावी अशी मागणी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना २५,००० रुपये हेक्टरी मदत तत्काळ देण्यात यावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नियम ५७ची नोटीस दिली आहे. अध्यक्षांची घोषणा करायची आहे. पण, नियम ५७ची सूचना महत्वाची आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्हाला मांडण्याची अनुमती द्यावी. राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे , मासेमारी करणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्यांना तात्काळ २५ हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.