चंडीगड : भारताकडे राफेल असते तर बालाकोट हवाई हल्ल्यावेळी पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची गरज भासली नसती. भारतातूनच 'जैश-ए-मोहम्मद'चे तळ उध्वस्त करणे शक्य झाले असते, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. राफेल शस्त्रपूजनावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.
हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, "मी एका सर्वसाधारण परिवारातून जन्म घेतला माझ्यावर लहानपणापासून जे संस्कार झाले तसा मी वागलो. ज्यावेळी दसऱ्यानिमित्त भारतात शस्त्रपूजन सुरू होते. त्यावेळी फ्रान्समध्ये राफेल मिळाल्यानंतर आपण शस्त्रपूजन केले होते. मात्र, कॉंग्रेसी नेत्यांनी त्याचे राजकारण करत मी सांप्रदायिक झाल्याची टीका केली. जे टीका करतात, त्यांनी घरात देवपूजा केली नाही का ", असा सवाल त्यांनी विचारला.