कर्नाटकात सप्टेंबरमध्ये सत्तांतर ! खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली सत्तांतराची भविष्यवाणी

    26-Aug-2018
Total Views | 21



बंगळूरू: कर्नाटक राज्यात सत्तेत असलेले जेडीएस आणि काँग्रेस या घटकपक्षांमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी काही केल्या संपण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस दोन्ही पक्षांतील सत्तासंघर्ष चिघळतच चालला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचे जाहीर वक्तव्य केल्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तर आपल्याजागी नवे सरकार येणार असून सप्टेंबर महिन्यात नवा मुख्यमंत्री पदग्रहण करण्यास सज्जही असल्याची भविष्यवाणी केली आहे. कुमारस्वामी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-जेडीएस संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून कोणत्याही क्षणी काहीही राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

काँग्रेस नेते व कर्नाटकचे सलग ५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामैय्या यांनी नुकतीच एका जाहीर कार्यक्रमात आपण पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली होती. तसेच, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विरोधी गटांनी केलेल्या कारस्थानांमुळेच आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, असे म्हणत स्वपक्षीयांवर शरसंधान केले होते. तसेच मला जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सिद्धरामैय्या यांच्या नाराजीची चर्चा कुमारस्वामी सरकारच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच आहे. अशातच, सिद्धरामैय्या यांचा हा आक्रमक पवित्रा चर्चेत आला असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तर त्याहूनही हद्द केली. ते म्हणाले की, पुढील महिन्यात नवे सरकार सत्तेत येणार असून नवा मुख्यमंत्रीही पदग्रहणास सज्ज आहे, असे मला प्रसारमाध्यमांतील व्यक्तींकडून समजते. माझे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सध्या जोरदार सुरू असल्याचे सांगत कुमारस्वामी यांनी सिद्धरामैय्या यांना अप्रत्यक्षरीत्या टोला हाणला.

 

काय घडत आहे, याबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मी घाबरलेलो नाही. मला माझ्या खुर्चीची काळजी नसून मी केवळ चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचेही कुमारस्वामी यांनी सांगितले. दरम्यान, सिद्धरामैय्या यांच्या या वक्तव्याचे जेडीएस पक्षातूनही तीव्र पडसाद उमटले. जेडीएस प्रदेशाध्यक्ष ए. एच. विश्वनाथ यांनी म्हटले की, सिद्धरामैय्या मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल. परंतु, ते कोणत्या पक्षाकडूनमुख्यमंत्री होणार आणि त्यांना कुणाचा पाठिंबा असणार? अशा शब्दांत विश्वनाथ यांनी त्यांना टोला लगावला. गेले काही दिवस सिद्धरामैय्या त्यांच्या गटातील १५ हून अधिक काँग्रेस आमदारांसह पक्षातून बाहेर पडून भाजपला पाठींबा देणार असल्याच्याही चर्चा आहेत. या सगळ्या परिस्थितीत कर्नाटकात सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप मात्र जेडीएस-काँग्रेस संघर्षावर शांत असून त्यामुळे या सर्व सत्ताकारणाची नाट्यमयता अधिकच वाढली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121