भाजप-सेनेला प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादीला एक जागा
कॉंग्रेसचा मात्र सुफडा साफ
मुंबई : सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्याच्या विधानपरिषद निवडणुकांचे निकाल अखेरकार आज जाहीर झाले आहेत. राज्यातील सहापैकी एकूण पाच जागांचे निकाल निवडणूक आयोगाने आज जाहीर केले आहे. यापाच जागांपैकी शिवसेना दोन, भाजप दोन आणि राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाली असून कॉंग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. दरम्यान उस्मानाबाद-लातूर-बीड या जागेची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून या जागेवर कोणता पक्ष आपला झेंडा लावणार याची उत्सुकता सध्या सर्वांना लागली आहे.
राज्य विधान परिषदच्या विदर्भातील दोन्हीही जागांवर भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून या दोन्ही जागा 'कॉंग्रेसमुक्त' करण्यात भाजपला यश आले आहे. अमरावती मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी कॉंग्रेसच्या अनिल मधोगरि यांच्या मोठ्या फरकाने पराभव केला असून मधोगरि यांना फक्त १७ मते मिळाली आहेत. तर प्रवीण पोटे हे ४४१ मतांनी विजयी झाले आहे. तसेच चंद्रपूरमध्ये देखील अशीच घटना घडली असून भाजपाचे रामदास आंबटकर यांनी ५५० मते मिळवत काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला आहे.
नाशिक येथील जागेवर शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर परभणी-हिंगोलीच्या जागेवर विप्लव बाजोरिया हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. दराडे यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी पराभव केला, तर बाजोरिया यांनी परभणीमध्ये काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा ३७ मतांच्या फरकाने पराभव केला. दरम्यान कोकणामध्ये मात्र शिवसेनाला मार खावा लागला असून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा याठिकाणी पराभव केला असून कोकणातील ही जागा राष्ट्रवादीला मिळवून दिली आहे.
दरम्यान कॉंग्रेस पक्षाला मात्र या विधानपरिषदेच्या एकाही जागेवर आतापर्यंत विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासाठी हा एक मोठा पराजय मानला जात आहे. परंतु बीडमधील आणखी एका जागेचा निकाल अजून जाहीर न झाल्यामुळे कॉंग्रेससाठी सध्या थोडी आशादायक स्थिती आहे, असे म्हणावे लागेल.