न्यायालयीन कामकाजात भारतीय भाषेचा वापर व्हायला हवा : भागवत

नवी दिल्ली : स्वभाषेचा प्रयोग केवळ व्यावहारिक सुविधा नाही तर स्वभाषा ही स्वत्वाची अभिव्यक्ती आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘जनतेला जनतेच्या भाषेतून न्याय’ या विषयावर नुकत्याच आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. यावेळी संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘स्व’ ची अभिव्यक्ती ही केवळ मातृभाषेतूनच शक्य आहे. भाव विदेशी भाषेतून व्यक्त होत नाहीत. लोकव्यवहारात बोलली जाणाऱ्या भाषेचा अनुवाद भाषेच्या भावानुरुप होऊ शकत नाही असे भागवत यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याच्या आंदोलनात बिरसा मुंडा यांचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्यासोबत पकडल्या गेलेल्या २४१ मुंडावी भाषा बोलणाऱ्या क्रांतिकारकांना त्यांच्या भाषेचे भाषांतर करणारा न मिळाल्यामुळे न्यायालयात याबद्दल सांगता आले नाही. खरंतर तत्कालीन ब्रिटिश न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यांच्यासोबत अन्याय झाला. तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते मात्र आता तर आपले भारतीयांचे राज्य आहे. न्यायालयांसहित सर्वत्र आपल्याच भाषेत स्वतंत्रपणे आपले म्हणणे मांडता आले पाहिजे असे ते म्हणाले.
देशात भाषेवरून कधीही संघर्ष झाला नाही
भारतात प्राचीन काळापासून इतक्या भाषा असूनही लोकांना निरनिराळ्या प्रांतातील लोकांशी संपर्क करायला कधीच काही अडचण आली नाही. सुदूर केरळमधील मल्याळी भाषा बोलणारे लोक हिमालयात तीर्थयात्रा करत असत आणि काशीचे हिंदीभाषी लोक रामेश्वरम् येथे कावड अर्पण करण्यासाठी जात असत. संपर्कासाठी भाषेवरून इतिहासात भारतात कोणताही मतभेद झालेला दिसत नाही असे भागवत यावेळी म्हणाले.
इंग्रजी माध्यमांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासात अडथळा
शाळेमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे मुलांच्या मनावर अनावश्यक ओझे वाढते. तसेच त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास थांबतो असे त्यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमामुळे मुले ज्ञानविज्ञानाचे मौलिक चिंतन करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांच्या भल्यासाठी कुटुंबात आणि स्वभाषा बोलणाऱ्या लोकांशी आपण आपल्या भाषेतच बोलून स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे आवाहनही भागवत यांनी यावेळी उपस्थितांना केले.