धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्या लोकांनीही या देशातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत आणि त्यांचा सन्मानच राखला गेला आहे. राहुल गांधी त्यांच्या आजोबांप्रमाणे धर्मपरंपरांचा वारसा नाकारूनही निवडणुकीचे राजकारण करू शकत होते. मात्र, मतांच्या भिकेसाठी राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे ढोंग आरंभले आहे, त्यावर कडाडूनच टीका केली पाहिजे. एका बाजूला कॉंग्रेसचे प्रवक्ते राहुल गांधी ‘जानवेधारी हिंदू’ असल्याचे सांगतात आणि दुसर्या बाजूला मंदिर प्रवेशाच्या वेळी त्यांची ओळख ‘पारशी’ म्हणून लिहिली जाते, तेव्हा हे ढोंग आहे हे सांगायला वेगळा पुरावा लागत नाही.
नरेंद्र मोदींच्या हातून गुजरात गेले की, केंद्रातील त्यांच्या दबदब्याला उतरती कळा लागेल, अशी अपेक्षा ठेऊन अनेक लोक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. एका बाजूला ही मंडळी आहेत तर दुसर्या बाजूला कॉंग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी तयार असलेले राहुल गांधी. कॉंग्रेस पक्षात क्रमांक एकची सर्वच पदे गांधी परिवारासाठी राखीव असतात. कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांना याची पूर्ण जाणीव आहे, पण लोकलज्जेसाठी का होईना, राहुल गांधींचे नेतृत्व कॉंग्रेसला सिद्ध करावेच लागेल. कारण, कॉंग्रेस पक्षात ‘मॉं-बेटे के गुलाम’ असले तरी संपूर्ण देशात तसे नाही. अध्यक्षपदाच्या तक्तपोशीपूर्वी जी निवडणूक भावी अध्यक्षांसमोर आली आहे ती गुजरातची.
एकेकाळी कॉंग्रेसचा भक्कमगड असलेले हे राज्य मात्र अन्य राज्यांप्रमाणेच कॉंग्रेसने गमावले. सध्या राहुल गांधी कॉंग्रेसचे ‘स्टार प्रचारक’ म्हणून गुजरातमध्ये फिरत आहेत. त्यांच्या सभेला होणारी गर्दी पाहाता कितीतरी मोदीद्वेष्ट्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. मात्र, अशीच गर्दी राज ठाकरेंच्या सभेला महाराष्ट्रात आणि उद्धव ठाकरेंच्या रोड शोला गोव्यात झाली होती. हजर असलेल्यांपैकी दोन टक्के मतेसुद्धा या दोन्ही नेत्यांना मिळाली नव्हती. मात्र, लोकशाहीत अनेक गोष्टी घडत असतात आणि लोकशाही टिकविण्याची किंमत म्हणून असे नेते लोकांना सहन करावेच लागतात. राहुल गांधींना गुजरातमध्ये काहीतरी चमत्कार घडवून आणायचा आहे. त्यांना काहीही वाटत असले तरी त्यांच्या पक्षाला तरी तसे वाटते. लोकशाहीत कुणालाही काहीही वाटू शकते, मात्र सध्या राहुल गांधींचे जे चाळे चालू आहेत, ते कॉंग्रेसचा कायमस्वरूपी निकाल लावणार यात शंका नाही.
गळ्यात हार घालून परदेशी पर्यटकांप्रमाणे राहुल गांधी सध्या गुुजरातच्या मंदिरांना भेटी देत आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी सुरुवात केलेल्या नवसर्जन यात्रेपासून हिंदू मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. चोटीलाला तर ते हजार एक पायर्या चढून गेले. राहुल गांधींच्या धर्मावर टीका करण्याचे लोकशाहीत कारण नाही. कोणी कुठल्या धर्माचे आहे, यानुसार या देशात कुठल्याही प्रकारची पदे वाटली गेलेली नाहीत. धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्या लोकांनीही या देशातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत आणि त्यांचा सन्मानच राखला गेला आहे. राहुल गांधी त्यांच्या आजोबांप्रमाणे धर्मपरंपरांचा वारसा नाकारूनही निवडणुकीचे राजकारण करू शकत होते. मात्र, मतांच्या भिकेसाठी राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे ढोंग आरंभले आहे, त्यावर कडाडूनच टीका केली पाहिजे.
एका बाजूला कॉंग्रेसचे प्रवक्ते राहुल गांधी ‘जानवेधारी हिंदू’ असल्याचे सांगतात आणि दुसर्या बाजूला मंदिर प्रवेशाच्या वेळी त्यांची ओळख ‘पारशी’ म्हणून लिहिली जाते, तेव्हा हे ढोंग आहे, हे सांगायला वेगळा पुरावा लागत नाही. ‘‘मते मिळू शकतात हे लक्षात आले, तर कॉंग्रेसचे लोक कोटावरसुद्धा जानवे घालू शकतात,’’ हे सावरकरांचे विधान आहे. मात्र, राहुल गांधी जी गाडी पकडायचा सध्या प्रयत्न करीत आहेत, ती केव्हाच सुटली आहे. स्वत: नरेंद्र मोदींनी भारताच्या निवडणुकीचा पोत बदलला. भावनिक विषयांपासून निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर नेली. राजकारणीदेखील उत्तरदायी असतो, हे ठणकावून सांगितले. राज्याराज्यांचे नेतृत्वही त्यांनी याच धर्तीवर आणले. हिंदुत्व विचाराची कास धरून मोदी सत्तेत आले, असे राहुल गांधींना कुणीतरी सांगितले आहे. ते सत्यच असले तरी राहुल गांधींना जे उमगले ते अर्धसत्य आहे.
गुजरात दंगलीसाठी मोदींनी माफी मागावी यासाठी या देशातल्या दांभिक सेक्युलरांनी जंग जंग पछाडले होते. मुलाखतींमध्ये त्यांना कचाट्यात पकडले गेले. सध्या बेरोजगार असलेल्या महाराष्ट्रातील एका पत्रकाराने तर त्यांना ‘नरराक्षस’ ही पदवीदेखील बहाल केली होती. मात्र, या मुखंडांच्या समाधानासाठी मोदींनी न केलेल्या पापांची माफी मुळीच मागितली नाही. वस्तुत: स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेस हा हिंदूंचाच पक्ष होता. हे ध्रुवीकरण करण्यासाठी राहुल गांधींचे आजोबा पंडित नेहरूच जबाबदार होते. भारताचे जेवढे नुकसान नेहरूंच्या धरसोड वृत्तीमुळे झाले, तेवढे अन्य कुठल्याही कारणामुळे झाले नाही. नको त्यावेळी ‘अलिप्त’ राहण्याच्या नेहरूंच्या भूमिकेमुळे मुस्लीमलीग सोकावली आणि जीनांचा उदय झाला. पुढे जीना हा सारा इतिहास फाळणीपर्यंत फरफटत घेऊन गेले. इतके होऊनही नेहरू स्वत:ला ‘अपघाताने हिंदू’ असे म्हणायला विसरले नाहीत. देशाची फाळणी आणि ब्रिटिशांच्या हातून हा देश भारतीयांकडे येण्यामागचे राजकारण हिंदू-मुस्लिमांचेच होते. मुस्लिमांच्या अवाजवी मागण्या आणि कॉंग्रेसने त्यापुढे तुकविलेल्या माना हाच कॉंग्रेसचा कालपर्यंतचा इतिहास आहे. कारसेवकांच्या रक्ताने मुलायमसिंहांनी शरयू लाल करून टाकली होती. यावर साधा चकारही कॉंग्र्रेसने काढला नाही. राहुल गांधींना थोडी उशिरा अक्कल आली, असे मानायलाही हरकत नाही. पण, परवा मुलायमसिंहांनी केलेल्या विधानावर त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. ‘‘गरज वाटली असती तर अजून कारसेवक मारले असते,’’ असे मुलायमसिंह म्हणाले. यावर राहुल गांधी काही म्हणाल्याचे स्मरत नाही. देशासाठी काहीही न करता केवळ दाढ्या कुरवाळायच्या आणि दाखविण्यासाठी जानवी घालायची, या राजकारणाचा काळ २०१४ साली संपला. २०१९ची निवडणूकदेखील याच आधारावर लढविली जाणार आहे. प्रश्न विकासाचे असतील. गुजरातच्या अख्ख्या निवडणुकीत राहुल गांधींनी या विषयावर अवाक्षरही काढलेले नाही. सुरुवातीचा सारा वेळ त्यांनी पाटीदारांना चुचकारण्यात घालविला आणि आता ते देवळातल्या घंटा बडवित फिरत आहेत. इतके करूनही देशातला कुठलाही ‘एक्झिट पोल’ कॉंग्रेसच्या किती जागा वाढतील, हे सांगायला तयार नाही. कारण, असे कुठलेही जागा वाढण्याचे प्रयोग गुजरातेत होणार नाहीत. राहुल गांधींचा पायगुण इतका जबरदस्त आहे की, ते जिथे जिथे गेले तिथे कॉंग्रेसची अवस्था दयनीय करून आले. त्यामुळे हिंदुत्वाच्या ढोंगाचे पाप ते सध्या डोक्याला लावत असलेल्या गंधाप्रमाणेच त्यांच्याच माथी असेल, असे मानायला हरकत नाही.