दरवर्षी किमान ५ शेतकऱ्यांना 'मानक कृषी संशोधन पदवी' द्या! मुख्यमंत्र्यांच्या कृषी विद्यापीठांना सूचना
29-May-2025
Total Views | 11
परभणी : शेतकरीसुद्धा शास्त्रज्ञच असून शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणाऱ्या दरवर्षी किमान ५ शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधन पदवी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठांना केली आहे. गुरुवार, २० मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५३वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीचे तसेच विकसित कृषी संकल्प अभियानाचे उदघाटन पार पडले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्याप्रमाणे विद्यापीठात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ काम करतात तसेच शेतकरीदेखील शास्त्रज्ञ आहेत. अनेक शेतकरी नवीन वाण तयार करतात किंवा नवीन पीक पद्धती तयार करतात, ज्यामुळे उत्पादकतेत वाढ होते. अशा शेतकऱ्यांना निवडून दरवर्षी किमान पाच शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधन पदवी दिली पाहिजे, अशी विनंती मी सगळ्या विद्यापीठांना केली आहे. कृषीमंत्री यामध्ये स्वत: लक्ष घालतील," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "मराठवाड्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी आधारित आहे. परभणीसारखा जिल्हा मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळेच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानिमित्ताने नवीन संशोधन, नवीन पीक पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतो. आपल्याला शाश्वत शेती कशी करता येईल आणि विशेषत: शेतीमध्ये गुंतवणूक कशी वाढवता येईल असा आमचा प्रयत्न आहे," असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत!
"केंद्र सरकारने महत्वाच्या पीकांच्या हमीभावात चांगली वाढ केली असून शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होईल. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. राज्यात चांगला पाऊस झाला पाहिजे. चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं, खरीपाला आणि रब्बीला फायदा होतो. तसेच उन्हाळी पिकांपर्यंत पाणी पुरते. त्यामुळे आम्ही पावसाचे स्वागतच करतो. पण अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हेही खरे आहे. त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना आम्ही मदत करू. त्याबाबतचे आदेश आम्ही दिले असून यापुढेही लक्ष ठेवून आहोत. भविष्यातही काही अवकाळी आली किंवा अतिवृष्टी झाल्यास आम्ही मदत करू," असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.