ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना...! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
29-May-2025
Total Views | 17
मुंबई : राज्यभरात सध्या पावसाचे थैमान सुरु असून शेती आणि घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
गुरुवार, २९ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "धान्य देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे होतील. मी त्याच्या मागावर असून बारामतीत असलो तरी सारखे दोन दोन तासांनी माझे फोन सुरु आहेत. त्यामुळे काळजी करू नका. जे नुकसान झाले त्यात शक्य ती सगळी मदत आम्ही करणार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांनी गुरुवारी बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरे आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील," असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना दिले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु असून पुढचे काही दिवस राज्याच्या विविध भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.