नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करा! मुख्यमंत्र्यांचे आदेश; कुठे किती नुकसान?
26-May-2025
Total Views | 15
मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे ज्या भागात नुकसान झाले तिथे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कुठे किती पाऊस? आणि किती नुकसान?
मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४.७५ मि.मी., इंदापुरात ६३.२५ मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीत २५ घरांशी अंशत: पडझड झाली असून पुरात अडकलेल्या ७ जणांना वाचविण्यात आले आहे. ७० ते ८० कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. काल मोबाईल सेवा विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे २ जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
फलटणमध्ये १६३.५ मि.मी. इतका पाऊस झाला असून एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. ३० नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे. सोलापूरमध्ये ६७.७५ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात ६ नागरिक पुरात अडकले होते त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
रायगडमध्ये एकाचा मृत्यू!
पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात ३ जण अडकले असून त्यांचे बचावकार्य सुरु आहे. रायगडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
पुढील २४ तास मुंबईत पावसाचा अंदाज!
मुंबईत २४ तासात १३५.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण ६ ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर ५ ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत ५ ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील २४ तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.