प्रेमाच्या चवीने मुरलेला ’गुलकंद’

    02-May-2025
Total Views |

प्रेमाच्या चवीने मुरलेला ’गुलकंद’



प्रेमाच्या कोशिंबिरीत रोजच्या नात्यांचे चविष्ट तुकडे असतात, पण काही चवी जिभेवर रुळायला थोडा वेळ लागतो, अगदी गुलकंदासारखं! गुलाबाच्या पाकळ्या जशा साखरेत मुरतात, काळाच्या कुशीत विश्रांती घेतात आणि मग कुठे त्या चवीला गंध लाभतो. ’गुलकंद’ हा चित्रपटसुद्धा तसाच एक अनुभव देऊन जातो. ही केवळ प्रेमकथा नाही, ही आहे भावना, नात्यांचे अस्पष्ट कंगोरे आणि त्या नाजूक नात्यांत मिसळलेला दाट गोडवा. कधी अल्लड हास्य, कधी सुस्कारा, तर कधी हलकासा सल, अशा मानवी भावनांचे मिश्रण एकत्रित करत ही कथा आपल्याला प्रेमाच्या गूढतेकडे, त्याच्या गोड आणि बोचर्‍या बाजूकडे अलगद ओढते. असा हा ‘गुलकंद’ म्हणजे मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावी, अशी एक गोड आठवण...



‘गुलकंद’च्या केंद्रस्थानी आपल्याला दोन कुटुंबे दिसतात, ढवळे आणि माने. त्यांच्या पारंपरिक सवयी, विचारसरणी आणि त्यापलीकडचा माणुसकीचा धागा. ही कथा नात्यांमध्ये गुदगुल्या करणारी तर आहेच, पण त्याचवेळी अंतर्मुख करणारीही. विनोदाच्या हलक्या वार्‍यावर ती वाटचाल करते, पण भावनांच्या खोल पाण्यात जाऊन मन हलवत राहते.

छोट्या पडद्यावर आपल्या टायमिंग आणि टोकदार विनोदांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारी सचिन मोटे-गोस्वामींची जोडी, आता रुपेरी पडद्यावर प्रेम आणि हास्याचे गोड असे मिश्रण घेऊन आली आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून त्यांनी केवळ गोष्टच सांगितलेली नाही, तर ती अनुभवू दिली आहे, ती चित्रपटाच्या प्रसंगांमधून, मुद्राभाषेतून आणि दृश्यांच्या सूक्ष्म तपशिलांतून. विनोदाला फक्त गालातल्या हास्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांनी त्याला भावनांच्या प्रवाहात मिसळू दिले आहे.

चित्रपटांच्या कथा बहुतेक वेळा प्रेम, संघर्ष आणि नात्यांच्या पलीकडचे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, ‘गुलकंद’ याहीपलीकडे जाऊन माणसांच्या स्वभावछटा अधोरेखित करतो. ही केवळ दोन कुटुंबांची किंवा चार पात्रांची गोष्ट नाही, तर ही आहे व्यक्तिमत्त्वांच्या टोकांच्या आघातावर उमलणार्‍या एक सूक्ष्म भावनिक प्रवासाची. एका बाजूला आहेत, रागिणी (ईशा डे) आणि मकरंद (समीर चौघुले) रंगीबेरंगी, धाडसी, आणि आयुष्याला एका भव्य नाट्यशैलीत पाहणारे. त्यांच्या नजरेत एक खास झगमगाट आहे आणि त्यांच्या बोलण्यात, वागण्यात सतत एक वार्‍याची झपाटलेली लय जाणवते. ते जगतात भावनेच्या भरात, निर्णय घेतात मनाच्या आवेगाने आणि त्यांच्या नात्यांमध्येही एक झणझणीत उधळण असते, थोडी भडक, पण मनात खोलवर रुजणारी. दुसर्‍या बाजूला आहेत, नीता (सई ताम्हणकर) आणि गिरीश (प्रसाद ओक) दोघेही अगदी शांत, स्थिर आणि आपल्या मोजक्या बोलण्यामध्येही खूप काही सांगणारे. त्यांच्या वाटचालीत एक संयम आहे, त्यांच्या नात्यात झळाळी नसलेली पण एक टिकून राहणारी चमक आहे. सई ताम्हणकरने साकारलेली नीता ही या जगातली समजूतदार बाई आहे, जिला गोष्टी तत्काळ नाही, तर हळूहळू उमजतात, तर प्रसाद ओकने साकारलेला गिरीश हा विचाराने नात्यांची वीण घट्ट करणारा, शांततेत समाधान शोधणारा पुरुष आहे.

या चार व्यक्तिरेखा म्हणजे चार वेगवेगळे रंग, चार चविष्ट घटक, जे एकत्र येतात तेव्हा ’गुलकंद’ नावाची एक गुंतवून ठेवणारी भावनासंपन्न गोष्ट तयार होते. यातील विरोधाभास ही केवळ कथानकाची गरज वाटत नाही, तर तेच कथानकाचे बलस्थान बनतात. एकीकडे भडक स्वप्नं, दुसरीकडे वास्तवाचं मृदू भान यांमधून निर्माण होणारा संवाद, संघर्ष आणि आपुलकी सिनेमाला नुसती गती देत नाही, तर प्रेक्षकाच्या मनाच्या खोल कप्प्यांत उतरतो.

समीर चौघुले आणि सई ताम्हणकरसारखे कलाकार जे पारंपरिक नायक-नायिकेच्या चौकटीत बसत नाहीत, त्यांनी साकारलेली पात्रे अधिक खरी वाटतात. कारण, ती आपल्या आसपासच्या लोकांसारखी वाटतात. त्यांचे नाते नायक-नायिकेसारखे नाही, तर जिव्हाळ्याचे, अनुभवांनी घडलेले आणि न बोलता बरेच काही सांगणार्‍या नात्यांपैकी एक प्रेमळ नाते आहे.

अभिनय हा कोणत्याही चित्रपटाचा प्राण असतो. ‘गुलकंद’मध्येही हा प्राण कलाकारांनी आपल्या नैसर्गिक अभिनयशैलीने इतक्या प्रभावीपणे पेरला आहे की, अनेक प्रसंग संवादांपेक्षा अधिक परिणामकारक ठरतात. प्रत्येक पात्राच्या मनोवस्थेला, त्याच्या आंतरिक द्वंद्वांना आणि बदलत्या नात्यांच्या छटांना कलाकारांनी फार संयमाने आणि बारकाईने हाताळले आहे. त्यांच्या अभिनयामधून केवळ कथा समोर येत नाही, तर त्या कथेला भावनांची खोल गडदता लाभते. ईशा डेने साकारलेली रागिणी माने ही अत्यंत उत्स्फूर्त, थोडीशी स्वप्नाळू आणि वेळोवेळी उग्रपणे प्रतिक्रिया देणारी स्त्री आहे. अशा प्रकारचे पात्र वठवताना अनेकदा अभिनय ‘ओव्हर’ होण्याचा धोका असतो. मात्र, ईशाने तिच्या भावनिक स्फोटांना एक खरेपणा दिला आहे. तिच्या डोळ्यांमधील झळाळी, वेगवेगळ्या प्रसंगांतील वागणुकीतील बदल, हे इतकं सूक्ष्मपणे रंगवलं गेलं आहे की, रागिणी ही व्यक्तिरेखा काहीशी अस्थिर असूनही प्रेक्षकाला खोटी वाटत नाही. उलट, तिच्यात एक मानवी अपूर्णता जाणवते, जी आपल्याला जवळची वाटते. समीर चौघुलेने साकारलेला मकरंद ढवळे म्हणजे तर एक रंगतदार नमुना. छोट्या पडद्यावर आपले विनोदी ‘टायमिंग’ दाखवून दिल्यानंतर, या सिनेमात त्याने विनोदाबरोबर भावनिक परिपक्वतेचेही दर्शन घडवले आहे. मकरंदचं पात्र हसतं, रुसतं, भांडतं आणि कधी कधी फारच आत्मकेंद्रीही होतं. पण, समीरने त्यात अशी एक प्रामाणिकता आणली आहे की, तो कधीही नाटकी वाटत नाही. विशेषतः काही ठिकाणी त्याने वापरलेली ’डेडपॅन’ शैली, म्हणजे भावनांपासून दूर असल्यागत बोलणं, पण आतून खोलवर ढवळून निघालेलं असणं, ती फार प्रभावी ठरते. पण, असं जरी असलं, तरी काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे, समीरचा अभिनय काहीसा ‘हास्यजत्रे’त साकारलेल्या पात्रांशी मिळता-जुळता वाटतो. सई ताम्हणकरचा अभिनय नेहमीच प्रगल्भतेचा ठसा असतो आणि ‘गुलकंद’मध्येही ती याला अपवाद नाही. नीता ढवळे ही भूमिका तीव्र भावना व्यक्त करणारी नाही, पण सईने डोळ्यांतील भाव, मुद्राभाषा आणि मोजकं, पण नेमकं बोलणं यांच्या माध्यमातून एका संयमी, सहनशील स्त्रीचं चित्रण फार सच्चेपणाने केलं आहे. तिच्या दृश्यांमध्ये शांतता असते, पण ती कंटाळवाणी वाटत नाही; ती अंतर्मुख करते. नीता ही व्यक्तिरेखा बोलणार्‍या पात्रांच्या गर्दीत न बोलता अधिक काहीतरी सांगून जाते आणि त्याचं श्रेय सईच्या अभिनयरचनेला जातं. प्रसाद ओक हा आजच्या मराठी चित्रपटसृष्टीतला एक जबरदस्त अभिनेता आणि ‘गुलकंद’मध्ये त्याने गिरीश माने या पात्रात एक परिपक्व, समजूतदार पुरुष भूमिका साकारली आहे. त्याचा अभिनय कुठेही मोठमोठ्या संवादांवर अवलंबून नाही. तो जिथे आहे, तिथे शांत आहे, पण उपस्थित आहे. गिरीशच्या शांततेत एक गहिरा माणूस लपलेला आहे, हे प्रसादच्या चेहर्‍यावरच्या सूक्ष्म हालचालींतून जाणवतं. त्याने साकारलेली भूमिका आजच्या धावपळीच्या जगात ’नाही’ म्हणणार्‍या, पण मूल्य सांभाळणार्‍या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करते. हे कलाकार अभिनयाच्या टोकांवर उभे राहात असूनही, कुठेही बटबटीत होत नाहीत. त्यांनी भावनांच्या विविध छटांना फार विश्वासार्हतेने जगातलं रूप दिलं आहे. त्यामुळे प्रेक्षक या पात्रांना ‘पात्र’ म्हणून नाही, तर ‘माणसं’ म्हणून पाहू लागतो आणि तोच ’गुलकंद’च्या अभिनयाचा खरा विजय आहे.

‘गुलकंद’चं संगीत हे या चित्रपटाच्या गोडसर, नाजूक आणि भावनिक सुरांचं प्रतिबिंबच जणू. ‘चल जाऊ डेटवर’ आणि ‘चंचल’ ही गाणी आधीच श्रोत्यांच्या मनात घर करून बसली आहेत आणि केवळ ऐकण्यापुरती नाही, तर सोशल मीडियावर या गाण्यांवर रिल्सचा अक्षरशः पूर आलेला आहे. प्रेमात भिजलेल्या नजरांनी, गालातल्या हसण्याने आणि भावनांच्या नाजूक स्पर्शाने या गाण्यांवर बनणार्‍या रिल्स हा एक स्वतंत्र ट्रेंड बनला आहे. प्रेक्षकांनी या गाण्यांना केवळ गाणं म्हणून नाही, तर स्वतःच्या आठवणींचा भाग बनवलं. पण, या अल्बमचा खरा गाभा म्हणजे ‘प्रेमाचा गुलकंद’ हे शीर्षकगीत. रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांचा स्वर एकत्र येतो, तेव्हा एक जादू निर्माण होते. अशी जादू जी एकाचवेळी गोडही वाटते आणि खोलही. या गीतात अमीर हडकरचे संगीत इतकं तरल आहे की, ते शब्दांशी स्पर्धा करत नाही, तर शब्दांना बिलगून उभं राहतं आणि त्या शब्दांना जिवंत करतं सचिन मोटेंचं कवितेच्या पातळीवर जाणारं लेखन. हे गाणं केवळ ऐकायचं नसतं, ते अनुभवायचं असतं आणि म्हणूनच, हे गाणं चित्रपटाचा आत्मा वाटतो.

दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी हा भावनांचा सुवासिक ‘गुलकंद’ मृदुतेने साकारला आहे. चित्रपटाचं कथानक पारंपरिक कौटुंबिक चौकटीतून उलगडत असलं, तरी त्यात आजच्या पिढीचं भाष्य, त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांना साजेसे नातेसंबंध फारच समजूतदारपणे गुंफले आहेत. काही ठिकाणी संवादांची लांबी थोडी कमी केली असती, तर संकलन अधिक धारदार वाटलं असतं, पण त्यातही एक नर्मविनोदी लय टिकून राहते.

सिनेमॅटोग्राफी अत्यंत साधी आणि नैसर्गिक आहे. ती कोणत्याही प्रकारचा दिखावा करत नाही, पण प्रत्येक फ्रेममधून प्रसंगांची भावनात्मक गरज पूर्ण करते. रंगसंगती विशेषतः सौम्य गुलाबी, पिवळसर आणि मातीच्या रंगातली आहे, जी कथानकाच्या घरगुती आणि नाजूक वातावरणाशी अतिशय सुसंगत आहे.

एकूणच, ‘गुलकंद’ हा फक्त एक चित्रपट नाही, तो एक अनुभव आहे. गाण्यांपासून अभिनयापर्यंत, संवादांपासून फ्रेमिंगपर्यंत, प्रत्येक गोष्ट जणू प्रेमाने मुरवल्यासारखी वाटते आणि म्हणूनच, हा गुलकंद एकदा चाखून बघणं आवश्यकच. कारण, कदाचित यातून तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या नात्याचा गोडवा पुन्हा अनुभवता येईल.

लेखक आणि दिग्दर्शक : सचिन मोटे, सचिन गोस्वामी
मुख्य कलाकार : समीर चौघुले, ईशा डे, सई ताम्हणकर, प्रसाद ओक

अनिरुद्ध गांधी