पश्चिम सीमेवरील पराक्रमानंतर पूर्वेकडील दहशतवाद्यांना ठोकलं! भारतीय सैन्याची बेधडक कारवाई
15-May-2025
Total Views | 35
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Assam Rifles on Myanmar Border) भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. अशातच भारत-म्यानमार सीमेजवळ असलेल्याल मणिपूरमधील चांडेल येथे आसाम रायफल्सने १० दहशतवाद्यांना ठार मारल्याचे समोर येत आहे. येथे उपस्थित आसाम रायफल्सना याबद्दल गुप्तचर माहिती मिळाली. त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबवत सदर कारवाई करण्यात आली.
आसाम रायफल्स दलाची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. यातून झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने १० अतिरेक्यांना ठार केले. शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. या कारवाईत कोणताही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त नाही. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर लष्कराची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.
भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने ट्विट केले की, "भारत-म्यानमार सीमेजवळील चंदेल जिल्ह्यातील खेगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र कार्यकर्त्यांच्या हालचालींबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, आसाम रायफल्स युनिटने दि. १४ मे रोजी एक कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावर प्रत्युत्तर देताना १० अतिरेकी ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला."
झोलँड नावाचे राज्य निर्माण करण्याचा अतिरेकींचा डाव
भारत सरकार आणि भारतीय लष्कराने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि म्यानमारची सीमा पूर्णपणे सील केली व याठिकाणी होणारी मुक्त हालचाल थांबवण्यात आली. मणिपूरमधील दोन महत्त्वाच्या जमाती, नागा आणि कुकी यांनी याला विरोध केला असला तरी, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून असे करणे आवश्यक होते. त्याचा परिणामही दिसू लागलाय. यामुळे लष्कराला अतिरेक्यांच्या हालचालींवर सहज लक्ष ठेवता येत आहे. भारत-म्यानमार सीमेवर झोलँड नावाचे एक नवीन राज्य निर्माण करण्याचा अतिरेकी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.