मुंबई, दि.१० : प्रतिनिधी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारणा-या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्ये कामकाज करत पूल व पुलाची अनुषंगिक कामे पूर्ण करावीत. जेणेकरून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवार, दि.६ मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची उंची १, २६५ मीटर आहे. रत्नागिरी जंक्शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावेळी बांगर म्हणाले की, सध्याच्या नियोजनानुसार, पूलाच्या बांधकामास ९ महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात रत्नागिरी जंक्शनच्या दोन्ही बाजूस खांब उभारणी, दोन आधारस्तंभ (पिअर्स) यांच्यामधील अंतराचे (स्पॅन) काम आणि अनुषंगिक कामे पूर्ण करावीत, जेणेकरून पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करता येईल.
जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव स्थित दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. या भूमिगत बोगद्यामध्ये शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदा देखील बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून तो पूर्ण करण्यात येत आहे. मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी संयंत्र (टनेल बोअरिंग मशीन) ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे भूखंड उपलब्ध करून देण्याकामी विनंती करण्यात आली असून महानगरपालिका अधिका-यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.