विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळ बैठकीत संतांची स्पष्ट भूमिका
24-Jan-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Baithak News Mahakumbh) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी देशभरातील संतगण सहभागी झाले होते. '१९८४ च्या धर्मसंसदेपासून संत समाज, हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि संघ हे अयोध्या, मथुरा आणि काशी येथील मंदिरांच्या प्राप्तीसाठी वचनबद्ध होते, आहेत आणि भविष्यातही राहतील.', अशी स्पष्ट भूमिका संतांनी व्यक्त केली.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी महाराज, विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार, केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागरा आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत पूज्य संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा संदर्भ लक्षात घेता हिंदू समाजाला मार्गदर्शन केले.
हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशभरात जागरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचा शंखनाद आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील बडा सभेतून करण्यात आला. सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणारे कायदे काढून मंदिरांचे व्यवस्थापन धर्माभिमानी भक्तांकडे सोपवावे, असे आवाहन यावेळी संतांनी केले.
भारताच्या उन्नतीसाठी सामाजिक समरसता, पर्यावरणाचे रक्षण, कौटुंबिक प्रबोधनाद्वारे हिंदू संस्कारांचे सिंचन आणि सामाजिक दुर्गुणांचे निर्मूलन, 'स्व' चे आत्मजागरण आणि चांगले नागरिकांचे कर्तव्य हे राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचेही संतांनी म्हटले.
किमान तीन मुले जन्माला यावीत
हिंदू समाजाच्या घटत्या जन्मदराचे प्रमुख कारण म्हणजे हिंदू लोकसंख्येतील असमतोल. हिंदू समाजाचे अस्तित्व जपण्याची महत्त्वाची जबाबदारी म्हणून प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान तीन मुले जन्माला आली पाहिजेत. हिंदू समाजाची लोकसंख्या समतोल राखण्यासाठी हिंदू समाजाचा जन्मदर वाढविण्याची गरज मार्गदर्शक मंडळाच्या पूज्य संतांनी व्यक्त केली आहे.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत खासदारांना आवाहन
वक्फ बोर्डाच्या निरंकुश आणि अमर्याद अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार कायदा सुधारणा कायदा आणणार आहे, केंद्रीय मार्गदर्शक मंडळ त्याचे स्वागत करते आणि हा कायदा मंजूर करून सर्व पक्षांच्या खासदारांनी त्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.