ज्येष्ठा गौरी - कनिष्ठा गौरी म्हणजे नेमक्या कोण? काय आहे ज्येष्ठागौरी पूजनाची कथा
11-Sep-2024
Total Views | 127
समुद्रमंथन या पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून हलाहल विषानंतर श्रीलक्ष्मी आणि तिची ज्येष्ठ बहीण श्रीअलक्ष्मीचा (ज्येष्ठा देवी) जन्म झाला. श्रीलक्ष्मी आणि श्रीअलक्ष्मी या दोन बहिणी म्हणजे जणू नाण्याच्या दोन विरूद्ध बाजूच. परंतु लक्ष्मी सोबतच तिची ही थोरली बहिण 'अलक्ष्मी' देखील पूजनीय आहे. लिंगमहापुराणानुसार आणि पद्मपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले.
श्रीविष्णूंनी अलक्ष्मीला दिले होते 'हे' तीन वर
या संदर्भात एक प्राचीन आख्यायिका अशी आहे की, जेव्हा समुद्रमंथनातून एका मागोमाग एक रत्नें बाहेर येत असताना श्रीलक्ष्मी हे रत्न प्रकट झाले. त्याक्षणी साक्षात भगवान श्रीविष्णूंनी लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. परंतु आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे लक्ष्मीने श्रीविष्णूंना सांगितले. श्रीविष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वी ब्राह्मणासोबत लावून दिला. पद्मपुराण, ब्रह्मखंडानुसार लक्ष्मी देवीचा श्रीविष्णूंसोबत विवाह होण्यापूर्वी ज्येष्ठा देवीचा विवाह उद्दालक ऋषींशी करावा लागला. लिंगमहापुराणानुसार अलक्ष्मीचा विवाह दुःसह नावाच्या मुनिब्राह्मणाशी केला होता.
विवाहानंतर अलक्ष्मीच्या उपद्रवी वर्तनामुळे व अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी एका अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षाखाली जाऊन रडत बसली होती. तिथून श्रीविष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची सगळी हकिकत ऐकून घेऊन त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर दिले. पहिला वर असा जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने दुःख, पिडा देऊ नये. तिसरा आणि म्हत्त्वाचा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. तेव्हापासून ज्येष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते.