"फास्ट फूड"कडून "सूपर फूड"कडे जाण्यासाठी केंद्राचे प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
22-May-2024
Total Views | 37
मुंबई : लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सकस आहार, हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 'कॅलरी चार्ट' लावणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी' दिनानिमित्त 'जेन एक्सएल ओबेसिटी' या संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत घेण्यात आली.
यावेळी फडणवीस यांनी लठ्ठपणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, हल्लीची मुले मैदानावर खेळण्यासाठी जात नाहीत. सर्वजण डिजिटल गेमकडे वळले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये मुलांनी मैदानावर जावे, यादिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने शाळांना पीटीचा क्लास बंधनकारक केला असून, विनामैदान शाळांना परवानगी दिली जात नाही.
त्याचसोबत आम्ही 'कॅलरी काऊंट' लिहिणे बंधनकारक करीत आहोत. रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये असे 'कॅलरी चार्ट' लावण्यासाठी प्रयत्न झाल्यास त्यातून जागरुकता निर्माण होऊ शकते. 'फास्ट फूड'कडून 'सूपर फूड'कडे जाण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत आपण पर्याय देणार नाही, तोपर्यंत लहान मुले फारसे ऐकणार नाहीत. आताची पिढी जागरूक आहे. पर्यावरणाबाबतही १२-१३ वर्षांची मुले भाष्य करतात. मात्र, आपण जे अन्न खातोय त्याबाबत जागरुकता नाही. आपल्या शरीरासाठी काय वाईट आहे, हे त्यांना सांगू शकलो, तर त्यातून जागरुकता वाढेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शाळांनी आहाराची जबाबदारी स्वीकारावी - राज ठाकरे
मुलांचा लठ्ठपणा ओळखायचा कसा, हे पालकांना कळायला हवे. फास्टफूड आल्यापासून लठ्ठपणा जगभर बळावत चालला आहे. जोपर्यंत घरातील जेवण खात होते, तोपर्यंत लठ्ठपणा नव्हता. मी जपानमधील शाळांचे व्हिडिओ पाहिले, तेथे डबा आणू देत नाहीत. आपल्याकडे आई वडिलांकडून डबा दिला जातो, त्यात बऱ्याच प्रमाणात या गोष्टी सरकवल्या जातात. शाळांनी जर आहाराची जबाबदारी स्वीकारली, तर त्यातून लठ्ठपणाचा विषय राहणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.