मुंबई : कुणी गेला म्हणजे पक्ष घेऊन जातो असं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रीया दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "बाबा सिद्दीकी सत्तेसाठी गेले आहेत. सत्ता आणि संपत्ती त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यांची काहीच विचारधारा नाही. त्यांना लोकांचं हित नाही. अधिकाधिक काय मिळवता येईल हे एकमेव उद्दिष्ट ठेवून ते लोकं फुटलेले आहेत. चौकशीच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी ते फुटले आहेत. अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा?"
ते पुढे म्हणाले की, "ज्यांच्यामागे चौकशा होत्या, जे कारवाईच्या कक्षेत होते ते सगळे लोक स्वत:ला वाचवण्यासाठी विचारधारा आणि पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. कुणी गेला म्हणजे पक्ष घेऊन जातो असं नाही," असेही ते म्हणाले आहेत.
गुरुवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. बाबा सिद्दीकी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो. ४८ वर्षांचा हा एक महत्त्वपुर्ण प्रवास आहे. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते पण ते म्हणतात ना, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो," असेही ते म्हणाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.