...अशी भाषा वापरण्याची हिंमत होतेच कशी? चित्रा वाघ यांचा काँग्रेस नेत्यांना सवाल
05-Nov-2024
Total Views | 156
मुंबई : ‘दम नव्हता तर’सारखी भाषा वापरण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले आणि दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर आता चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "लाडकी बहिण योजना लागू झाल्यापासून विरोधकांमध्ये जणू महिलांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. आमच्या भगिनी शायना एनसी असोत किंवा कोल्हापुरात आज छत्रपती घराण्यातील सून असोत, ‘दम नव्हता तर’सारखी भाषा वापरण्याची हिंमत होते तरी कशी? महिलांना कमी लेखणार्या या प्रवृत्तीचा तीव्र निषेध. काँग्रेस नेत्यांना माझी विनंती आहे, महिलांच्या अपमानाचे हे सत्र तत्काळ थांबवा," असे त्या म्हणाल्या.
"माझी पुर्णपणे फसवणूक केली. मला तोंडघशी का पाडलंत? आधीच निर्णय घ्यायचा होता. दम नव्हता तर उभं राहयचं नव्हतं. मी पण माझी ताकद दाखवली असती," अशा शब्दात सतेज पाटील यांनी मधुरीमा राजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.