"चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं...", राधाकृष्ण विखे पाटील यांची बाळासाहेब थोरातांवर कडाडून टीका
27-Oct-2024
Total Views |
मुंबई : ( Radhakrishna Vikhe Patil ) भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संगमनेरमधील संकल्प मेळाव्यात बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल १२ तास ठिय्या मांडला होता.
वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरातून सुजय विखे पाटील यांच्यासह वसंतराव देशमुख यांच्यावर टीका केली जात आहे. वसंतराव देशमुखांच्या वक्तव्यावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संगमनेरमध्ये मेळावा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा सन्मान करणारं महायुतीचं सरकार आहे. केवळ घोषणा देऊन मतं मिळत नाही. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सरकारने केलंय. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. त्याची प्रचिती आता यायला लागलीय. तिसऱ्यांदा मोदींना लोकांनी पंतप्रधान केलं. बदलापूर आणि संगमनेरसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेला आघाडी जबाबदार आहे. महायुतीला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू आहे," असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
"चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं"
उमेदवार कोणताही असो युती म्हणून भूमिका घ्या. दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली.