मुंबई : “भारतात २०२४ पर्यंत ‘हायड्रोजन ट्रेन’ धावतील,” अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हावडा-पुरी ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवासादरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे. ओडिशाला गुरुवारी पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन मिळाली असून याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पुरी ते हावडा प्रवास केला.
यावेळी रेल्वे मंत्रालय हायड्रोजन ट्रेनवर काम करत असून येत्या २०२४ पर्यंत भारतात हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसेच, ५०० किलोमीटरहून अधिक अंतराच्या ‘वंदे भारत’मध्ये स्लीपरच्या योजनेवरही मंत्रालय काम करत असल्याचीही माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
जून महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण देश ‘वंदे भारत’शी जोडला जाईल आणि रेल्वे मंत्रालय ४०० ‘वंदे भारत’ चालवणार आहेत. ईशान्य भारतातील राज्यांतदेखील लवकरच ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू करण्यात येईल आणि ईशान्येला राष्ट्रीय राजधानीशी जोडण्यासाठी मोठ्या रेल्वे प्रकल्पांवर कामदेखील सुरू आहे.
अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री