ठाणे : “मराठीसाठी आम्ही जेव्हा आंदोलने करीत होतो. तेव्हा हे घरात चिंतन करीत बसले होते, यांचे हिंदुत्व म्हणजे जपमाळ आहे. अयोध्या दौर्यावेळी राजकारण करणार्यांचे काय झाले. त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावे लागले. तेव्हा, माझ्या वाट्याला जाऊ नका,” अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडवली. तसेच, डिजिटल प्रचाराचा नारळ फोडून आपण सत्तेपासून दूर नसल्याचे सांगून राज यांनी मनसैनिकांना आश्वस्त केले. गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
’संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी’ या टॅगलाईनसह राज ठाकरे यांनी मनसेच्या पुनर्निर्माणाचे शिवधनुष्य हाती घेत गुढीपाडव्याचा टीझर दाखवून डिजिटली प्रचाराचा नारळ फोडला. भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा उल्लेख करून, मी माझ्या कार्यकर्त्याचे रक्त वाया जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा दिला.
मनसेचे ‘आम्ही काय केले’
गेल्या १७ वर्षांतील आंदोलनांसह विविध कामगिरीचा आढावा घेणार्या ’आम्ही काय केले’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन व मनसेच्या संकेतस्थळाचे अनावरण राज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मनपा निवडणुकांचे मार्च-ऑक्टोबर सुरू असल्याने गेली दोन वर्षे नापास झाल्यासारखे वाटत असल्याची मिश्कील टीकाही त्यांनी केली.