मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी किल्ल्यावर करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी किल्ल्यातील परिसराची स्वच्छता केली आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
दरम्यान, शिवडी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी मंत्री लोढा म्हणाले कि, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात येत असून, आजच्या या कार्यक्रमात राज्यात ४१८ आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व ४० आय.टी.आय. संस्थांनी गड किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ऐतिहासिक अशी प्रतापगडाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, याची नोंद घेतली जाईल", असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.
राज्याच्या कौशल्य विभागाकडून ‘स्वच्छता हीच सेवा अभियान’अंतर्गत गड किल्ले स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. या अभियानातंर्गत हे सर्व किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून, त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी मंत्री लोढा यांच्या पुढाकाराने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा व आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन.,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिंगाबर दळवी उपस्थित होते.