सावरकरांचा उपमर्द करण्यासाठी जो अविवेकीपणा लागतो, तो द्वादशीवारांकडे पुरेपूर आहे. मात्र, मूळ मुद्दा निराळा आहे. ज्या साहित्यप्रेमींच्या श्रद्धेमुळे हे सारे चालले आहे, त्यांची आपण किती काळ परीक्षा पाहणार?
संतसाहित्याचे महामेरू आणि आपल्या संतकाव्यातून समाजातल्या विसंगतींवर कोरडे ओढणारे कवी म्हणजे संत तुकाराम. त्या काळाला साजेसे साहित्य प्रसवणारे हे महाकवी कालातीत झाले, ते त्यांच्या विचारांबाबतच्या स्पष्टतेमुळे. हा सगळा तपशील पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, सालाबादप्रमाणे सुरू झालेली साहित्य संमेलनाची बजबजपुरी. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन हा शारदीय महोत्सव न राहता, आपल्या राजकीय विचारांची धुणी धुण्याचा घाट झाला आहे.
या धुणी धुण्यातून जे काही घडते, जे साहित्य संमेलनाचे आयोजक आणि त्यांचे कंपू ज्या प्रकारे साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असतात आणि अध्यक्ष निवडतात, त्यातून मराठी भाषाप्रेमी व साहित्य रसिकांच्या उत्साह व आनंदावर विरजण पडण्याचे काम होते. मराठी भाषा, कलारसिक, नवमाध्यमांच्या काळात निर्माण होणारे नवे प्रवाह, या सगळ्यांशी संमेलनाचे काही देणेघेणे राहिलेले नाही.
त्याची जागा केवळ आणि केवळ बजबजपुरीने घेतली आहे. या सगळ्याला एकमेव अपवाद होता, तो ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांचा. त्यानंतर साहित्य संमेलनात बजबजपुरीचे साम्राज्य पुन्हा सुरू झाले. खरेतर एकाहून एक दिग्गज अशा साहित्यिकांनी या पदाची शोभा वाढविली. त्यांची नावे लिहायला घेतली, तर जागा अपुरी पडेल. मात्र, नंतर एक पायंडा हळूहळू पडू लागला, तो म्हणजे, निखळ साहित्यापेक्षा राजकीय विचार आणि आणि तो अप्रत्यक्षपणे चालविणारी साहित्यिक मंडळी स्थानापन्न व्हायला लागली. भ्रष्ट राज्यकर्त्यांचा भ्रष्टपणा झाकण्यासाठी ही मंडळी काम करू लागली. ‘साहेब’ कसे सुसंस्कृत आणि साहित्यप्रेमी हे सांगणार्या कलाकार, कवी, नट, दिग्दर्शक यांची एक मालिकाच सुरू झाली. यातल्या बर्याच लोकांची विधान परिषदेवर वर्णी लागली.
काहींना कायमस्वरूपी महामंडळे मिळाली. सरकारी गाड्या, कार्यालये आणि कर्मचारी दिमतीला मिळाले. काहींना ‘पद्म’ पुरस्कारही मिळाले. ज्यांचे चित्रपटातील संकलन अत्यंत टूकार आहे, अशा दिग्दर्शकांना कायमस्वरूपी राजाश्रयदेखील मिळाला. अनेकांचा हा डामडौल तथाकथित राज्य पुरोगामी लोक सत्तेत असेपर्यंत कायमही राहिला. या सगळ्याचा साहित्यनिर्मितीशी काहीच संबंध नव्हता. तिथे सगळ्यांचाच र्हास सुरू झाला. या सगळ्या राजकीय उठाठेवींचा फटका सगळ्यात जास्त जर कुणाला बसला असेल, तर तो मराठी साहित्यविश्वाला. आज साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या आधीच जे वाद सुरू होतात, ते याच प्रक्रियेचा भाग आहेत. विविध शासकीय समित्यांवर जाऊन बसण्याची स्पर्धाच इतकी मोठी होती; आता ती राहिली नाही म्हणून साहित्याच्या क्षेत्रातून गरळ ओकण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे.
मराठीच्या या दुर्दैवाला अनेक पदर आहेत. त्यातला अजून एक पदर सुमारांचा आणि मक्तेदारांचा आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या बाबतीत ज्या घटकसंस्था म्हणून कार्यरत असतात, त्यांच्यातही ‘कणा’ असलेल्या लोकांची संख्या कमीच आहे. कुणाची तरी दादागिरी खपवून घेऊन ही मंडळी वाटेल ते वागत असतात आणि साहित्य संमेलनाच्या दिवशी व्यासपीठावरील 500-100 खुर्च्यांत त्यांचीही एखादी खुर्ची लागावी, अशीच त्यांची माफक अपेक्षा असते. या सगळ्यातून ‘हो’ला ‘हो’ म्हणणारी एक रचनाच आकाराला आली आहे. ही रचना आतून भांडत असते. मात्र, असे काही चिल्लर लाभ समोर आले की, एकमेकांची काळजी घ्यायला लागते.
साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाची निवडही आता अशाच लोकांच्या माध्यमातून होऊ लागली आहे. अरुणा ढेरेंची निवडही त्यातल्या त्यात काही शहाण्या लोकांनी संमेलनाच्या अब्रूच्या बुडत्या जहाजाला वाचविण्यासाठी केली होती. मात्र, त्यानंतरही तोच किस्सा सुरू झाला. अरुणा ढेरेंनी मोठ्या ‘धाडसाने’ हे पद स्वीकारले होते. यातला ‘धाडसाने’ हा शब्द त्यांच्या धैर्याचे द्योतक नसून मराठी भाषेच्या दुर्दैवाचे आहे. कारण, आज ज्यांच्या गळ्यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे, तीच मुळी अपघाताने आहे. ही सर्व संमेलने व्यवस्था आणि मराठीचा कनवळा आणि अभिमान असलेले लोक या दोघांमध्ये बरेच अंतर आहे.
खरेतर या दोघांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मराठीत कसदार लिहिणारे, उत्तम साहित्यनिर्मिती करणारे असे कितीतरी लोक आहेत. मात्र, त्यांना या चिखलात बरबटायचे नाही. त्यामुळे विदर्भात साहित्य संमेलन होत असताना, ज्यांच्यासाठी आग्रह चालला होता, त्या लेखिकेने सरळ नकार दिला. सिंहाने जंगल सोडले की, लांडग्यांचे राज्य सुरू होते. त्याप्रमाणे आता सत्तेच्या पदापासून दुरावलेल्या लाळघोट्या तांड्यांची समूहनृत्ये घुमू लागली आहेत. द्वादशीवारांचे परवाचे सावरकरांबाबतचे विधान असलेले भाषणही त्याचेच द्योतक होते.
सावरकरांचे भाषेतील योगदान, साहित्यिक प्रतिभा, त्यांनी रचलेले काव्ये ही सर्व त्यांची संपदा. विवेकाने विचार केला आणि त्यांची हिंदुत्व मांडणी न पटणारी वाटली, तरी त्यांचे साहित्यिक योगदान सूर्याइतकेच प्रखर आहे. एकेकाळी काँग्रेसधार्जिण्या असलेल्या दैनिकाच्या संपादक पदावरून निवृत्त झालेल्या माणसाकडून आपण काय अपेक्षा ठेवावी? या वयात गांधींच्या आडून आपल्याच विचारांच्या दुंगण्या झाडायला साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मिळावे, वर्तमानपत्रात त्यादिवशी मथळे मिळावे व नंतर वर्षभर संमेलाध्यक्ष व्यासपीठांवर पोहोचण्याची संधी मिळावी, यापलीकडे या मंडळींचे काही उद्देशही नाहीत.
या सगळ्या बिनवकुबाच्या माणसांकडून यापलीकडे कोणतीही अपेक्षाही ठेवणे चुकीचे आहे. यातल्या बर्याच घटक संस्था कंपूशाही पद्धतीनेच चालतात. अनेक संस्थांत निवडणुकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे विंदांच्या कवितेप्रमाणे तीच ती माणसे तेच ते अजेंडे घेऊन काम करीत आहेत. मराठी प्रकाशक, मुद्रक भाषा विषयात भविष्य घडवू इच्छिणारी नवी पिढी यांच्यासाठी साहित्य संमेलनाकडे स्टॉल भाड्याने देण्यापलीकडे काय आहे? ‘डिजिटल’चा बागुलबुवा मुद्रक-प्रकाशकांना दाखविला जातो. मात्र, त्या ‘डिजिटल’ क्षेत्रात मराठीचा झेंडा रोवण्यासाठी साहित्य संमेलनाकडे काहीच नाही. कुणासाठी काहीच नसलेले हे साहित्य संमेलन का आणि कसे चालते, या प्रश्नाचे उत्तर साहित्यप्रेमींच्या श्रद्धेत दडले आहे? या रसिक मायबापाची आपण किती काळ परीक्षा पाहणार आहोत, ते ठरवावे लागेल.