- चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी
01-May-2025
Total Views | 13
मुंबई, जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असल्याने प्रदेश भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी केली.
महाराष्ट्र दिनाला घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, या क्रांतिकारी निर्णयाबद्दल महाराष्ट्र भाजपाने राज्यातील एक लाख १८६ बूथ आणि १ हजार २८० मंडल समित्यांसह महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल. जातनिहाय जनगणना लोकशाही मजबूत करणारा महत्तम टप्पा असून, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्याध्येयपूर्तीची पाऊलवाट अधिक पक्की होईल, ही खात्री आहे.
गळाकाढू काँग्रेसी गप्प का?
जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडे राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.