ज्या निष्पक्षपणे चंद्रचूडांनी रामजन्मभूमी खटल्यात न्याय्य भूमिका घेतली, त्याच परखडपणे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. आस्तिक-नास्तिक या वादात त्यांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक करायला हवे.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या व माध्यमांच्या विश्वात खळबळ माजावी किंवा तथाकथित अशी घटना घडली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ‘आपण नास्तिक नाही,’ असे ठणकावून सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. ‘बीबीसी’चे ज्येष्ठ पत्रकार स्टफीन सॅकूर यांनी चंद्रचूड यांना ‘राम मंदिराचा निकाल सुनावण्यापूर्वी तुम्ही देवासमोर बसला होतात का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रचूड यांनी हे उत्तर दिले. मुळात एका स्वच्छ कारकीर्द असलेल्या व कोणत्याही दबावाखाली न झुकण्याच्या परंपरेला साजेशा वागणार्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त सरन्यायाधीशांना असा प्रश्न विचारणे, हे आगाऊपणाचेच होते. मात्र, पाश्चिमात्त्य दृष्टिकोन व त्याच दृष्टिकोनातून उरलेल्या जगाकडे पाहण्याच्या सवयीतून हा असहिष्णू प्रश्न आला आहे. ब्रिटिशांनी आशिया व आफ्रिकेवर आपले वर्चस्व लादले. त्यांचे हवे तसे शोषण केले व आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हा वर्चस्ववादी स्वभाव इथे ‘बीबीसी’च्या मुलाखतकाराच्या प्रश्नात दिसून येतो.
आधुनिक सिंगापूरचे निर्माते ली. क्वान यू यांच्या चरित्राला अमेरिकन मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांची प्रस्तावना आहे. त्यात आशियाला समजून घेण्यात या गोर्या लोकांनी कशी गल्लत केली, हे फार सुंदर मांडले आहे. आस्तिक-नास्तिक हा वाद मुळात भारतीय नाही. हिंदूंमध्ये नास्तिकांना अस्तित्वाचा, विचाराचा, अभिव्यक्तीचा संपूर्ण हक्क आहे. चार्वाक, बौद्ध दर्शन, जैन दर्शन यासारख्यांचे ठसठशीत योगदान हिंदू संस्कृतीत आहेत. नास्तिकाला स्थान नाही, ते इस्लाम व ख्रिश्चॅनिटीमध्ये! चर्चचे महत्त्व वाढविण्याकरिता आधी क्षमापत्रांची विक्री करण्यापासून ते कितीतरी अघोरी प्रकार करण्यात आले. त्यातून जो रोष निर्माण झाला, त्यातून निधर्मी राज्यव्यवस्थेची संकल्पना पुढे आली. युरोप व ज्या ज्या देशांनी साठी-सत्तरीच्या दशकात अशा प्रकारच्या राज्यघटना स्वीकारल्या, तिथे त्यांना पूर्वीपेक्षा पुढे जाता आले. कारण, अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू चर्चचा अडसर राज्यव्यवस्थेतून दूर झाला.
एखाद्या चांगल्या औषधाचा जसा दुष्परिणामही असतो, तशीच नास्तिक असण्यालाच पुरोगामी समजणार्यांची एक जमातच तयार झाली. यात मार्क्सने ‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ हे तत्त्वज्ञान त्याच्या अनुयायांना पाजले आणि या तत्त्वज्ञानाच्या नशेतच ही मंडळी घुमू लागली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही नास्तिक असल्याशिवाय पुरोगामी असू शकत नाही, असा एक विचित्र प्रवाह निर्माण झाला व भारतातही त्या प्रवाहाचे प्रवासी निर्माण झाले. यात डाव्या समाजवाद्यांचा मोठा सहभाग होता. माध्यमे, सिनेमा, नाटक, संगीत, कला अशा सगळ्याच क्षेत्रांत ही मंडळी वैचारिक गुंडगिरी करू लागली आणि हे खोटे पुरोगामित्व अतिशय चुकीच्या पद्धतीने भारतीय समाजावर लादले गेले.
भारतीय राज्यव्यवस्थेचे तीन महत्त्वाचे स्तंभ - संसद म्हणजेच राजकारणी, नोकरशाही, न्यायव्यवस्था या प्रक्रियेचे बळी पडले. एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाने धर्माला आपल्या धार्मिक अधिकारांचे स्वातंत्र्य दिले. मात्र, दुसर्या बाजूला हिंदू आपल्या न्याय्य हक्कांसाठी या तिन्ही महत्त्वाच्या घटकांची दारे वर्षानुवर्षे ठोकत राहिले. कोणे एकेकाळी नोकरशाहीच्या हृदयाला हिंदूंच्या भावनांनी पाझर फोडला नाही. हिंदूंच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याकरिता न्यायदेवतेेने आपल्या डोळ्यावरची पट्टी कधीही जराशीदेखील सरकवली नाही. राजकारण्यांनी तर कहरच माजवला होता. काशी, मथुरा, अयोध्या या राम, कृष्ण व शिव या मानबिंदूंच्या महत्त्वाच्या पूजास्थानांबाबत सर्वोच्च न्यायालये, स्थानिक न्यायालये यात वर्षानुवर्षे खटले सुनावणी शिवायच रखडत पडले होते. ज्ञानवापी समोरचा नंदी हा हिंदूंच्या सहनशीलतेचे मूर्तिमंत प्रतिबिंब होता व आजही आहे.
नोकरशाहीची तर कमालच होती. करदात्यांच्या पैशावर संरजामी डौलात आयुष्य जगणार्या काही सनदी अधिकार्यांचे कारनामे यासंदर्भात तर धक्कादायकच आहेत. रामजन्मभूमी आंदोलन अत्यंत वेदनादायक टप्प्यावर असताना व रामजन्मभूमीसाठी कारसेवक आपल्या प्राणाची आहुती त्यात द्यायला तयार असताना, माधव गोडबोले हे मराठी गृहस्थ भारताचे गृहसचिव होते. ‘धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर’ हे त्यांचे पुस्तक आपण वाचले, तर आपल्याला धक्काच बसेल. रामललाच्या दर्शन व उपासनेच्या धर्मदत्त न्याय्य मागणीसाठी अयोध्येत पोहोचलेल्या कारसेवकांना जन्माची अद्दल कशी घडविता येईल, याचे एकाहून एक क्रूर आराखडे या महाशयांनी केंद्र सरकारसमोर सादर केले होते.
यात स्टेनगनधारी पॅराट्रूपर्स कारसेवकांमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अयोध्येत उतरवून त्यांना कसे ठार मारता येईल, तारेच्या कुंपणांमध्ये अतिदाबाच्या विजेचे प्रवाह सोडून कारसेवकांना कसे रोखता येईल, असे त्यांचे सल्ले होते. आता यांचे सल्ले तत्कालीन केंद्र सरकारने मानले असते, तर काय झाले असते, त्याची कल्पनाही करवत नाही. हिंदूहिताच्या जीवावर हा धर्मनिरपेक्षतेचा ठेका त्यांनी का घेतला होता, हे कुणीही सांगू शकत नाही. हे धर्मनिरपेक्षतेचे फिदायनी धर्मवेडेपण या नास्तिकतेच्या व नास्तिकतेला धर्मनिरपेक्ष मानण्याच्या आग्रहातूनच आलेले आहे. निधर्मीवादाचा उन्माद यावेळी इतका होता की, त्यात हजारोे हिंदू जीवानीशी गेले. काश्मिरी हिंदूंना तर आपल्या घरादाराला मुकावे लागले. मुल्ला मुलायमसिंहांनी तर कहरच केला होता. भारताची संसद संतमहंतांच्या मागण्यांची दखलही घ्यायला तयार नव्हती, असे हे दु:शासन पर्व होते.
नास्तिक असणे व आपल्या असण्याचे जगजाहीर प्रदर्शन करणे, यात गौरव मानणे ही आपल्याकडे फॅशन झाली होती. 2014 साली या देशात हिंदूहिताचे आमूलाग्र राजकीय परिवर्तन घडून आले व हिंदूहिताच्या सुवर्णकाळाला प्रारंभ झाला. चंद्रचूडांचे अभिनंदन यासाठी की, त्यांनी अनावश्यक पवित्रे न घेता, आस्तिक-नास्तिक धर्मनिरपेक्षता या संकल्पना सहजपणे मांडल्या व आपल्या कर्तबगारीने त्या सिद्धही केल्या. न्यायासाठी याचना करण्यात आलेल्या व्यक्ती व संस्थांचा धर्म न तपासता, सत्य-तथ्य व पुराव्यांच्या आधारे रामजन्मभूमीचा निकाल त्यांनी दिला व भारतीय न्यायव्यवस्थेतले एक अन्यायपर्व दूर झाले. ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ अशी एक न्यायालयीन संज्ञा आहे. स्वत:च्या न्याय्य-हक्कांसाठीदेखील न्यायालयाचे दार ठोठावणारा सहिष्णू हिंदू समाज काशी व मथुरेच्या बाबतही लागू होईल, अशी आशा हिंदू समाज बाळगतो. जिथे सत्य आणि तथ्याच्या आधारावर पुरावे सापडले आहेत, संविधानसंमत तपास संस्थांना ते मान्य आहेत, अशा खटल्यांत हिंदू समाजाने न्यायाची अपेक्षा ठेवणे गैर नाही. ढोंगी पुरोगामित्वाचे एक एक बुरुज ढासळत असताना व आपला देश उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करीत असताना, या ढोंगाला चंद्रचूडांनी दिलेला हा धक्का महत्त्वाचा मानावा लागेल.