महाराष्ट्र लवकरच जगाची स्टार्टअप राजधानी बनणार : देवेंद्र फडणवीस
नवीन स्टार्टअप धोरणाचा मसुदा जाहीर
17-Jan-2025
Total Views | 46
मुंबई : “महाराष्ट्र ( Maharashtra ) हे आपल्या नाविन्यपूर्ण आणि उद्योगस्नेही धोरणाने जगाची स्टार्टअप राजधानी हा लौकिक लवकरच मिळवेल,” असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाकडून ‘नाविन्यतेला सशक्त करून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, ‘नायका’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायका आणि राज्यभरातून हजारो नवउद्योजक, उद्योगक्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या सोहळ्यात स्टार्टअप्स संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन केले होते.
‘महाराष्ट्र राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीम’ ही देशातील अव्वल क्रमांकाची इकोसिस्टीम आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने आखलेल्या उद्योगस्नेही धोरणांनी महाराष्ट्र हे लवकरच जगाची स्टार्टअप राजधानी बनेल, यात शंकाच नाही. राज्य सरकार स्टार्टअपना भेडसावणार्या गुंतवणूक, कुशल मनुष्यबळाचा पुरवठा, नवीन तंत्रज्ञान, विविध पूर्तता करायला लागणे अशा विविध समस्यांवर काम करत आहे, लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल. महिला उद्योजकतेेला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजनादेखील सुरू केली आहे.
नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या सर्वांना गती देण्यासाठी राज्य सरकार लवकरच इनोव्हेशन सिटी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रातील स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि ‘इझ ऑफ बुकिंग बिझनेस’मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन स्टार्टअप धोरण जाहीर करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या धोरणाचा कच्चा मसुदा या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. दोन महिन्यांत यावर विविध सूचना आणि हरकती मागवून या धोरणाचा अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्टार्टअप्सना अर्थसाहाय्य करण्यासाठी, डिजिटल एक्ससेलन्स सेंटर उभारणीसाठी, मॉडेल करियर सेंटर उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य आणि सीडबी, सीआयआय, एचपी इंडिया या संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले.
स्टार्टअपच्या बळकटीकरणासाठी सरकार आणि उद्योजकांनी एकत्र काम करावे : मंत्री लोढा
२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे स्टार्टअप धोरण जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राने पुढाकार घेत आपले स्टार्टअप धोरण तयार केले. आज जगात नाविन्यता, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांना मिळणारे अर्थसाहाय्य यांच्यामध्ये बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ती कसर भरून काढण्यासाठी सरकार आणि नवउद्योजकांनी एकत्र काम केले पाहिजे. महाराष्ट्राला जगाची स्टार्टअप राजधानी बनवण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम केले पाहिजे.
महाराष्ट्रात उद्योग करणे फायदेशीर : फाल्गुनी नायका
“महाराष्ट्रात उद्योग सुरू करणे हे नक्कीच फायदेशीर आहे, शासन आणि यंत्रणांकडूनही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचे आहे. महाराष्ट्र सरकार स्त्रियांमधील उद्योजकतेला वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे नक्कीच सुखावणारे आहे. भारतातील या अशा सुप्त शक्तीचा वापर केला, तरच भारत आणि महाराष्ट्रात स्टार्टअप संस्कृती रुजेल,” असे मत देशातील कॉस्मेटिक निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी नायकाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायका यांनी मांडले.