सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ही विश्वकर्मा योजनेची मूळ भावना : पंतप्रधान नरेंद्र मोदी
20-Sep-2024
Total Views | 36
वर्धा : सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ही विश्वकर्मा योजनेची मूळ भावना आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची केले आहे. शुक्रवारी वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजचा भारत आपल्या कापड उद्योगाला जागतिक बाजारपेठेत टॉपवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहे. देशातील कापड उद्योगातील हजारों वर्ष जुना अभिमान पुन्हा परत आणणे, हे देशाचे लक्ष्य आहे. विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनासाठी आम्ही वर्धेची निवड केली. कारण विश्वकर्मा योजना ही केवळ सरकारी कार्यक्रम नाही तर विकसित भारत करण्यासाठीचा एक रोडमॅप आहे."
"आपले पारंपारिक कौशल्य हाच देशाच्या समृद्धीचा सर्वात मोठा आधार होता. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मुर्तीकार, मिस्त्री असे अनेक समाज भारताच्या समृद्धीचा पाया होते. त्यामुळे गुलामगिरीच्या काळात इंग्रजांनी या स्वदेशी कलेला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. म्हणूनच वर्धेच्या या भूमितून गांधींजींनी ग्रामिण उद्योगांना चालना दिली होती. परंतू, स्वातंत्र्यानंतरच्या सरकारने या कौशल्याला योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांनी कायम विश्वकर्मा समाजाकडे दुर्लक्ष केले. परंतू, आता स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आमच्या सरकारने परंपरागत कौशल्यांना नवी ऊर्जा देण्याचा संकल्प केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पीएम विश्वकर्मासारखी योजना सुरु केली. सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ही या योजनेची मूळ भावना आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मागील एक वर्षांच्या आकडेवारीनुसार, एससी, एसटी आणि ओबीसी समाज विश्वकर्मा योजनेचा सर्वात जास्त लाभ घेत आहे. विश्वकर्मा समाजातील हे पारंपारिक काम करणारे लोक केवळ कारागीर बनून न राहता त्यांनी उद्योजक बनावं, असं मला वाटतं," असेही ते म्हणाले.