मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि संघाचे अमूल्य योगदान

    15-Sep-2024
Total Views | 100
 
Rashtriya Swayamsevak Sangh
 
मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग! रझाकारांच्या अन्यायाला त्रासलेल्या मराठवाड्यातील जनतेला मुक्ती मिळाली, त्यात संघाचे फार मह्त्त्वाचे योगदान होते. राष्ट्राच्या हिताप्रति अखंड सजग असणार्‍या संघ स्वयंसेवकांच्या सजगतेचे ते उत्तम उदाहरणच होते. संघाच्या या सजग आणि त्यागवृत्तीवर टाकलेला हा प्रकाश...
 
सत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठविलेल्या संदेशावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अविश्वास दाखवला असता ,किंवा त्यांनी जॉन ऑचिनलेक यांच्या मखलाशीवर विश्वास ठेवला असता, तर काय झाले असते? हा प्रश्न तदनंतर उद्भवतो! त्याआधी प्रश्न असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वातच नसता तर? किंवा जेमतेम २२वर्षांचा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, एवढी मोठी जोखीम पत्करलीच नसती तर काय झाले असते? भारत सरकारला दिल्लीतून पळ काढावा लागला असता? भारताची राजधानी तातडीने अन्यत्र हलवावी लागली असती? पाकिस्तानची राजधानी झाली असती दिल्ली? कदाचित पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नसता! हैदराबाद, जुनागड आणि जम्मू-काश्मीर संस्थाने पाकिस्तानात विलीन झाली असती? दि. १७ सप्टेंबरचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन बघायलाच मिळाला नसता? भारत आणखी खंडविखंड होत गेला असता? संपला असता कदाचित. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मनात तसूभरही सहानुभूती नसलेल्या, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडून दि. २६जानेवारी १९६३ रोजी राष्ट्रीय पथसंचलनात सहभागी होण्यासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाचारण करण्यात आले होते! त्यावेळची परिस्थितीच तशी होती, १९६२ चीनने भारतावर केलेल्या आक्रमणात, भारताचा नामुष्कीजनक पराभव झाला होता! अवघ्या २४तासांच्या आत सर्व तयारी करुन, गणवेशधारी संघपथक राष्ट्रीय पथसंचलनात सहभागी झाले होते. शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
 
दि. ६ आणि दि. ७ सप्टेंबर १९४७ रोजी मध्यरात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे एक गोपनीय संदेश धाडला गेला. दि. १०सप्टेंबर रोजी संसद भवन उडविले जाईल, सर्व मंत्र्यांची हत्या केली जाईल, आणि लाल किल्ल्यावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी योजना दिल्लीतील मुस्लीम समुदायाने आखली आहे. संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेला असल्यामुळे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याची तातडीने दखल घेतली. सेनापती जॉन ऑचिनलेक यांना तातडीने पाचारण करण्यात आले, सैन्य सज्जता-उपलब्धता याविषयी विचारणा करण्यात आली. दिल्लीत सैनिकांची उपस्थिती फारच कमी आहे. दिल्लीबाहेरुन सैनिक तुकड्या दिल्लीत बोलावणे तसे जोखमीचे काम आहे. हे काम तातडीने करता येण्यासारखे नाही. त्यासाठी बराच वेळ लागू शकतो असे जॉन ऑचिनलेक यांनी सांगितले. सारी चर्चा व्हाईसराय माऊंटबॅटन यांच्या समोरच चालली होती. वज्रनिर्धारी सरदार वल्लभभाई पटेल कडाडले, आसपासच्या सगळ्या सैन्य छावण्यांना तातडीने संदेश पाठवा. त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त सैन्य तुकड्या तातडीने दिल्लीत बोलावून घ्या. निघा त्याच दिवशी सायंकाळपासूनच वेगवेगळ्या छावण्यांमधून सैन्य तुकड्या दिल्लीकडे रवाना होऊ लागल्या. दुसरा दिवस उजाडेपर्यंत पर्याप्त सैन्य तुकड्या दिल्लीत पोहोचल्या होत्या.
 
पोलीसदलांना सोबत घेऊन, सैन्य कारवाई सुरु झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठविलेल्या संदेशानुसार, सर्व संशयास्पद ठिकाणांची झाडाझडती एकाचवेळी वेगात सुरु झाली. प्रत्येक धाडीमधून फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा, दारुगोळा हाती लागला. पहाडगंज मशीद, सब्जीमंडी मशीद आणि मेहरोली मशीद येथे सर्वाधिक शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आला. भारतीय सैनिकांना अनेक ठिकाणी स्टेनगनधारी, ब्रेनगनधारी मुसलमानांचा कडवा प्रतिकार मोडून काढावा लागला. सब्जीमंडी परिसरातील काकवान बिल्डिंग ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैनिकांना सर्वाधिक झुंजावे लागले, २४तासांहून अधिक वेळ लागला. मेहरोली मशिदीतून भारतीय सैनिकांवर स्टेनगन आणि ब्रेनगनचा मारा होत होता. सलग चार-पाच तासांच्या संघर्षानंतर मेहरोली मशीदही ताब्यात आली.
 
तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष आचार्य कृपलानी यांच्या माहितीनुसार, मुसलमानांनी आपापल्या घरांमध्ये, मशिदींमध्ये प्रचंड शस्त्रसाठा जमा करुन ठेवला होता. झाडाझडतीत बॉम्ब, दारुगोळा, आग्नेयास्त्र यांचे भांडार-कोठार हाती लागले. मोठ्या प्रमाणावर स्टेनगन, ब्रेनगन, मोर्टार आणि वायरलेस ट्रान्समिटर सापडले. शस्त्रास्त्रे, हत्यारे तयार करणारे गुप्त कारखानेही उघडकीस आले. ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांकडून अशा घातक हत्यारांचा वापर करण्यात आला, त्या त्या ठिकाणी निकराची झुंज द्यावी लागली. पोलीसदलात मुसलमान पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे हत्यारबंद उपद्रवी दंगलखोरांशी लढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुसलमान पोलिसांपैकी कित्येक पोलीस सरकारी वर्दी आणि हत्यारांसह फरार झाले, आणि दंगलखोर मुसलमानांना जाऊन मिळाले. जे मुसलमान पोलीस मागे उरले होते, त्यांची निष्ठाही संशयास्पद वाटत होती. म्हणून सरकारला अन्य प्रांतांमधून पोलीस आणि सैनिक मागवावे लागले (कृपलानी, गान्धी, पृष्ठ २९२-२९३) दिल्ली ताब्यात घेण्याची ही पाकिस्तानधार्जिणी योजना कोणी आखली होती? ही योजना आखणारे कोणी सामान्य मुसलमान नव्हते. यात मोठमोठे मुसलमान सरकारी अधिकारी सामील होते, ज्यांच्यावर तत्कालीन भारत सरकारचा पूर्ण विश्वास होता. यात तत्कालीन दिल्ली पोलीसदलातील मोठमोठे मुसलमान अधिकारी, दिल्ली विश्वविद्यालयातील वरिष्ठ मुसलमान अधिकारी सामील होते. ही षड्यंत्रकारी योजना खूप विचारांती बारिकसारिक तपशील विचारात घेत काटेकोरपणे कागदावर उतरवत आकाराला आली होती. या योजनेचे कागदी बाड दिल्ली विश्वविद्यालयातील एका वरिष्ठ मुसलमान अधिकार्‍याच्या हवेलीतील भरभक्कम तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आले होते!
 
अखंड दक्ष असलेल्या संघ स्वयंसेवकांना या षड्यंत्रकारी कटाचा, आणि हवेलीतील तिजोरीचा सुगावा लागला. त्यांनी ही बातमी वरिष्ठ संघ अधिकार्‍यांपर्यंत तातडीने पोहोचवली. योजना तयार झाली. तिजोरी फोडून त्यातले कागदी बाड हस्तगत करण्याची जबाबदारी, वरिष्ठ संघ अधिकार्‍यांनी एका ‘खोसला’ नामक संघ स्वयंसेवकावर सोपविली. खोसला यांनी निवडक संघ स्वयंसेवकांची एक तुकडी तयार केली. तुकडी दिल्ली विश्वविद्यालयातील त्या अधिकार्‍याच्या हवेलीकडे रात्री रवाना झाली. हवेलीबाहेर ‘मुस्लीम नॅशनल गार्ड’चे कार्यकर्ते पहारा देत उभे होते.
 
खोसला : “वालेकुम अस्सलाम, हम अलीगढ़ से आए हैं। अब यहाँ पहरा देने की हमारी ड्यूटी लगी है। आप लोग जाकर सो जाओ।” पहारा देत असलेले मुसलमान पहारेकरी निघून गेले. जिगरबाज खोसला तुकडीने ती तिजोरीच हस्तगत केली, आणि ट्रकवर लादून घेऊन आले. तिजोरी फोडून त्यातले कागदी बाड उघडले, तेव्हा सगळेच अवाक झाले. हादरुन गेले.
 
दिल्लीत आजकाल संसद सदस्यांसाठी जी निवासस्थाने-बंगले आहेत, त्यातल्या एका निवासस्थानी काही स्वयंसेवक सरकारी अधिकार्‍यांची रात्रबैठक बोलाविण्यात आली. बाड उघडून त्यातली षड्यंत्रकारी योजना कशी विफल करता येईल, यावर गहन मंथन करण्यात आले. साधकबाधक चर्चेअंती निष्कर्ष निघाला की, संघ पातळीवर हे षड्यंत्र विफल केले जाऊ शकणार नाही. हे काम भारतीय सैन्यदलच करु शकते! त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे संदेश पाठवायला हवा. ठरले! त्या बैठकीतील दोन-तीन निवडक कार्यकर्त्यांनी रात्री १ वाजेच्या सुमारास थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निवासस्थानी जावे, गरज पडल्यास त्यांना झोपेतून जागे करुन, सगळी माहिती त्यांच्या कानावर घालावी...
सरदार वल्लभभाई पटेल : अगर यह सच न हुआ तो?
 
कार्यकर्त्यांकडून दिलेले उत्तर : आप हमें यहीं बिठा लीजिए, तथा अपने गुप्तचर विभाग से जाँच करा लीजिए। अगर यह सच साबित न हुआ तो हमें जेल में डाल दीजिए। सरदार वल्लभभाई पटेल यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरु केली (विभाजनकालीन भारत के साक्षी, कृष्णानन्द सागर) आणि त्यानंतर जे झाले ते इतिहास सर्वसाक्षी आहे. रझाकारांच्या अन्यायातून मुक्त झाला आणि भारताचे होणारे नुकसानदेखील टळले. असा हा संघ आजही देशाच्या कोणत्याही अडचणीच्या काळात हाक मारताच तत्क्षणी मदतीला धावून जाणार्‍या स्वयंसेवकांची मोठी फळीच उभी करत आहे. त्यातूनच संघांची शक्ती वाढत आहे.
संघे शक्ति युगे युगे
 
लेखक - सोमनाथ देशमाने
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121