पनवेल :“भाजप सत्तेकडे लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो. मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहात आहेत. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला. विष जसे लगेच पसरते, त्याप्रमाणे विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत,” अशी घणाघाती टीका ठाण्याचे आ. संजय केळकर यांनी मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी केली. भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, “मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपण जगात एक नंबरवर आहोत. आपल्या देशाचा सर्वांगिण विकास होत असताना आजूबाजूच्या राष्ट्रांनाही मोदीजींनी ताकद दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत घोटाळे केले. मात्र आता सत्ता हाती लागत नाही, हे पाहून समाजामध्ये तेढ करणारे वातावरण निर्माण करण्यात आले.
आणि जातीपातीचे राजकारण करून बेदाग मोदी सरकाराला बदनाम करण्याचा षडयंत्र रचला गेला. महिलांच्या सन्मानार्थ योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अंमलात आणल्या आहे. मात्र विरोधकांकडून त्या योजनांच्या बाबतीतही अपप्रचार करण्याचा डाव सुरु झाला आहे. त्यामुळे विरोधकांनाही रडीचा डाव बंद करावा,” अशा शब्दांत आ. केळकर यांनी खडेबोल सुनावले.