मुंबई : निर्भया प्रकरणाच्या वेळी आणलेल्या शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. उरण हत्या प्रकरणातील पीडिता यशश्री शिंदेच्या कुटुंबाला शर्मिला ठाकरेंनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "निर्भया प्रकरणाच्या वेळी आणलेल्या शक्ती कायद्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत आम्ही पाठपुरावा करू. अशा पद्धतीचे जे हिंस्त्र गुन्हे करतात त्यांना हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान असं काहीही न करता दोन महिन्याच्या आत कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी आम्ही पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसेच आम्ही पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांना शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करणार आहोत."
"आज भारतभर या घटना घडत आहेत. मुलींना पळवून नेत त्यांच्यावर बलात्कार करून हिंस्त्रपणे मारण्यात येत आहे. निर्मया प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला सोडण्यात आलं आहे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. ज्याची मनोवृत्ती विकृत आहे तो कितीही वयाचा असला तरी त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. कारण विकृताला वय, जात, धर्म असं काहीच नसतं," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "दाऊद शेख पॉक्सोमध्ये तुरुंगात गेला असतानाही बाहेर येऊन त्याने एवढा मोठा गुन्हा केला, याबद्दल मला आश्चर्य वाटतं. आम्ही पोलिस विभागावर नाराज आहोत. या प्रकरणात तुमच्यावर कुठलंही दडपण नाही, मग तुम्ही का तुमची दहशत निर्माण करत नाही? असं मी पोलिसांना म्हटलं. ब्रिटीशकालीन कायदे असताना असे गुन्हेगार नव्हते. परंतू, आता विकृती वाढत असल्याने आपल्याला कायदे बदलण्याची गरज आहे. ७५ वर्षे झाल्यानंतरही आपण किती वर्षे तेच कायदे वापरणार आहोत?" असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला आहे.