शिवप्रेमींनंतर आता 'विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती'ही आक्रमक!
18-Jul-2024
Total Views | 166
मुंबई (प्रतिनिधी) : (Vishalgad News Update) "स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली. त्यामुळेच याचिकाकर्त्यांना न्यायालयात जाण्यास अवधी मिळाला. हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर शासनाने कारवाई करावी.", अशी मागणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे निमंत्रक बाबासाहेब भोपळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
दि. १४ जुलैला शिवप्रेमींचा उद्रेक झाल्यावर प्रशासनाने दि. १५ जुलै रोजी अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात प्रशासनाने शासकीय महाअधिवक्त्यांचा अभिप्राय मागवला होता. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय येथे जे बांधकाम हटवण्यास स्थगिती दिली आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे हटवता येतील. असे असेल, तर आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने अन्य अतिक्रमणे का हटवली नाहीत ? हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून नेहमीच हिंदुत्वनिष्ठ आणि गडप्रेमींची दिशाभूल का करण्यात आली? असे बाबासाहेब भोपळे यांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिल्यावर ‘पावसाळ्यात अतिक्रमण काढता येत नाही’, असे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र ही स्थगिती केवळ ६ अतिक्रमणांपुरती मर्यादित होती, हे आता स्पष्ट झाले. याचा अर्थ तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी हिंदुत्वनिष्ठांना वारंवार खोटे सांगितले, हेच सिद्ध होते. असा आरोप भोपळे यांच्याकडून करण्यात आला आहे.