उबाठा गट पुन्हा फुटणार? निवडून आलेले दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात
08-Jun-2024
Total Views | 901
मुंबई : ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. उबाठा गटाचे निवडून आलेले दोन खासदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिवसेनेत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
नरेश म्हस्के म्हणाले की, "देशात इंडी आघाडीचं सरकार येईल असं उबाठा गटाच्या निवडून आलेल्या खासदारांना वाटत होतं. पण ते आलं नाही. तसेच शिवसेनेचा विचार आणि तत्व सोडून विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. याची सलही या खासदारांच्या मनात टोचत आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. दोन खासदार आल्यास ते अपात्र होऊ शकतात. त्यामुळे आम्ही आणखी ६ खासदार जमवतो, असं त्यांनी सांगितलं आहे," असा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे.
"काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन मशिदी, प्रार्थनास्थळांतील मुल्ला मौलवींना लाखों रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन उबाठा गटाने आपल्याकडे मतं पाडून घेतली. ते शिवसेनेचे मतदार कधीच नव्हते. शिवसनेच्या विचारापासून फारकत घेऊन मतं मिळवण्यात ते यशस्वी झाले," असे ते म्हणाले.
"तसेच संविधान बदलणार हा एक गैरसमजही पसरवण्यात आला. त्यामुळे केवळ तीन ते चार जागांचा फायदा उबाठाला झालेला आहे. पण आता लोकांच्या हे लक्षात येतंय. त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं त्यांना पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे आणि आमदार, नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिल्लक आमदार, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहाताहेत. आमच्याशी संपर्क साधत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संपर्क साधून निर्णय घेणार आहे," असेही ते म्हणाले.