मुंबई : एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना आता मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळणार आहे. कारण मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणात एकूण ५.३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या साठवण क्षमतेत घट झालेली आहे.
मुंबईतील मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांची पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी या सात धरणातून दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणातून विविध जलवाहिन्यांच्या माध्यमातून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढलेला उष्मा, पाण्याचे बाष्पीभवन, पाण्याची मागणी, पावसाची कमतरता यामुळे पाण्याची साठवणक्षमता घटली आहे. ज्यात अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात शुन्य टक्के पाणी साठा असून उर्वरित पाच धरणातून मुंबईला सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यामुळे मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळते.
धरणात किती पाणीसाठा शिल्लक
अप्पर वैतरणा - शून्य टक्के
मोडक सागर- १५.७३ टक्के
तानसा- २२.०५ टक्के
मध्य वैतरणा- ९.६४ टक्के
भातसा- शून्य टक्के
विहार- १७.९२ टक्के
तुळसी - २४. ४६
दरम्यान पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून जलसंवर्धनासाठी जनजागृतीपर पोस्टर समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यात घरगुती वापरासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.