भारतीय इतिहास हा अनेक घटकांचा व घटनांचा समाहार आहे. इतिहास समजून घेत असताना, आपण विविध कालखंड, त्यातील चांगल्या व वाईट व्यक्ती, त्यांचे योगदान, त्यांच्याशी संबंधित कथा, वस्तू व वास्तू इ. गोष्टींचे चित्रकोडे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. भारतात अनेक राजवंश उदयास आले. काहींनी अनेक युद्धांतून आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, तर काहींनी आपल्या राज्याचे व प्रजेचे रक्षण केले. 18व्या शतकात मराठ्यांनीदेखील हेच केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न, भारतात मराठा साम्राज्य उभारून पूर्ण केले. मात्र, पेशवे थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे इत्यादींसारख्या 18वे शतक गाजविणार्या वीरपुरुषांप्रमाणेच, एका स्त्रीने इतिहास घडवत असताना, आपल्या विस्मृतीत गेलेल्या भारतीय संस्कृतीचा पाया पुन्हा भक्कम केला. या लेखाद्वारे आपण नर्मदेकाठी वसलेल्या महेश्वर नगरात, प्रातःस्मरणीय गंगाजळ निर्मळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तेथील वास्तव्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
इंदूरपासून 96 किमी अंतरावर असलेले महेश्वर, हे आपल्या अनेक लहान-मोठी मंदिरे, छत्र्या आणि 28 घाटांसाठी प्रसिद्ध असून, मध्य प्रदेश राज्यातील ते एक प्रमुख पर्यटनस्थळदेखील आहे. स्कंद पुराणात या नगरीचे नाव ‘महिष्मती’ असून, त्यास वायु पुराणात पंचपुरींपैकी एक ‘महेश्वरपूर’ असे म्हटले आहे. वायु पुराणांतर्गत ‘महिष्मती महात्म्य’ या ठिकाणी असलेला किल्ला हा चंद्रवंशी राजांनी बांधला होता, अशी माहिती देते. परंतु, आज पाहता येणारा महेश्वरचा किल्ला, हा मुघलकालीन असून त्याला नंतर अधिक बळकट मराठ्यांनी केले. होळकर घराण्याचे संस्थापक व माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर, यांना दि. 3 ऑक्टोबर 1730 रोजी 74 परगणे यांची ‘सरंजामी जागीर’ प्राप्त झाली. पुढे दि. 20 जानेवारी 1734 रोजी मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमाबाई यांना छत्रपती शाहू महाराजांच्या परवानगीने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकरवी ‘खासगी जागीर’ प्राप्त झाली. गौतमाबाई यांच्या निधनानंतर ही जागीर, या घराण्यातील थोरल्या सुनेला म्हणजेच अहिल्याबाईंना मिळाली. या जहागिरीच्या माध्यमातून होळकर घराण्यातील सुनांनी व नंतरच्या काळातील महाराणींनी, धार्मिक व चरितार्थ कार्य करणे अपेक्षित होते. असे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या स्थानी म्हणूनच, अहिल्याबाईंबरोबर अजून तीन होळकर राजघराण्यातील स्त्रियांच्या छत्र्या बांधल्या गेल्या.
मल्हारराव होळकर यांचे पुत्र व अहिल्याबाई यांचे पती, खंडेराव यांचा कुंभेर, राजस्थान येथे दि. 24 मार्च 1754 रोजी तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला आणि 29 वर्षीय अहिल्याबाई तरुण वयात विधवा झाल्या. त्यांचे चिरंजीव मालेराव लहान असल्याने, अहिल्याबाई यांना मल्हाररावांनी सती जाऊ दिले नाही. मात्र, खंडेराव यांच्या इतर दोन पत्नी व सात उपपत्नी सती गेल्या. कालांतराने 1766 साली मल्हारराव आणि त्यांच्या पाठोपाठ मालेराव यांचाही मृत्यू झाला. इंदूरच्या गादीला वारस नसताना, तसेच आपल्यासोबत कोणीही परिवारातील ज्येष्ठ व राजकारणात अनुभवी व्यक्ती नसताना, अहिल्याबाई डगमगल्या नाहीत. अशा परिस्थितीत क्षिप्रा नदीपर्यंत आपले सैन्य घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या, रघुनाथराव पेशवे यांचादेखील मोठ्या चतुराईने त्यांनी सामना केला. या प्रसंगी माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाई यांची साथ दिली. दि. 11 डिसेंबर 1767 साली, पेशवे माधवराव यांनी अहिल्याबाईंना खासगी जहागिरीची अधिकृत अधिकारिणी बनविले. अशा प्रकारे अहिल्याबाईंनी आपली राजधानी इंदूर येथून महेश्वरला 1767 साली हलविली.
महेश्वर येथे आल्यावर त्यांनी विणकारांसाठी महेश्वरच्या किल्ल्यात स्वतंत्र पेठ निर्माण केली. तसेच, सावकार व व्यापारींसाठी अदितवार आणि मंगळवार पेठांची निर्मिती केली. येथील विणकर विविध रंगांतील महेश्वरी साड्या बनवू लागले. या साड्यांना विविध प्रकारचे जरीचे काठ असत. त्यांपैकी, करवत, चटई, रुईफूल, बुगडी, जाई इ. पारंपरिक काठांचे प्रकार प्रसिद्ध आहेत. याचबरोबर त्यांनी महेश्वर किल्ल्याबाहेर मल्हारगंज, फणसेपुरा आणि गोविंदपुरा या नव्या वसाहतींची स्थापना सुभेदार मल्हारराव (सासरे), सरदार यशवंतराव फणसे (जावई) आणि खासगीचे दिवाण गोविंदराव यांच्या स्मरणार्थ केली. महेश्वर येथे श्री राजराजेश्वर, काशीविश्वेश्वर, मातंगेश्वर, वृद्ध कालेश्वर, जालेश्वर, तिळ भांडेश्वर, रामेश्वर या शिव मंदिरांबरोबर परशुराम, मार्तंड, विठ्ठल, राधाकृष्ण, गोपाळ, राम, गणपती, मारुती, विंध्यावासिनी, महालक्ष्मी, नर्मदा, शितला माता, वटयक्षणी इ. विविध देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार व बांधकाम केले. या मंदिरांच्या स्थापनेपश्चात महेश्वर, येथे भारताच्या विविध भागांतून ब्राह्मणांना कायमस्वरुपी वस्ती करण्यास आमंत्रित करण्यात आले.
संगमनेर येथून मल्हारभट्ट मुळ्ये (पुराण व विधी), रत्नागिरी येथून रामचंद्र रानडे (उपासनेसाठी), नर्मदेच्या तीरावरून जानोबा पुराणिक (पुराण), निहाल भट्ट (पुराण व विधी) व भैय्या शास्त्री ऋग्वेदी (व्याकरण, वेदांत व शास्त्र), तेलंगणातून गोटू शास्त्री (वेद) व मनोहर बर्वे (कीर्तन), गुजरात येथून गणेश भट्ट (ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र), बालकृष्ण भट्ट जोशी (ज्योतिषशास्त्र आणि विधी), बलीरामजी (उपासना विधी), दाजी रघुनाथ व गणेशराम (औषध तज्ज्ञ) येथे आले. अहिल्याबाईंचा खासगी ग्रंथसंग्रहसुद्धा अफाट होता. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त महात्म्य, व्यंकटेशस्तोत्र, गीतगोविंद (टीकेसह), ज्ञानेश्वरी, पंचरत्नी गीता, वेदपोथी, चातुर्मास प्रयोगपत्रे, मल्हारी कवच, रूक्मिणीस्वयंवर, दानचंद्रिका, पूजाप्रकार, रघुवंश (टीकेसह), रसमंजिरी (टीकेसह), भगवद्गीता, अनुवेदांत, शिक्षा उपनिषद, नारायण उपनिषद, विष्णुप्रतिष्ठा पद्धती, देवीची मानसपूजा, नवग्रह यंत्र, संवत्सरी श्राद्ध, द्रोणपर्व, भीष्मपर्व, विराटपर्व इ. अशा महेश्वरला 72 पोथ्या होत्या. तसेच, चांदवडला वाल्मिकी रामायण, मयुख, शांती मयुख, समय मयुख, दान मयुख, श्राद्ध मयुख, प्रायश्चित्त मयुख, उत्सर्ग मयुख, निर्णय सिंधू, मथुरा महात्म्य, यमुना महात्म्य, मार्गशीर्ष महात्म्य, कार्तिक महात्म्य, धर्मशास्त्र, कन्यादान विधी, हरिवंश इ. 24 पोथ्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी पाटण, राजस्थान येथील खुशालीराम भट्ट या धर्मशास्त्राच्या विद्वानाकडून ‘अहल्या कामधेनु’ नामक ग्रंथाची रचना करून घेतली. यात राजाच्या कर्तव्यांविषयी चर्चा केली असून त्यात आठ वत्स म्हणजेच अध्याय आहेत.
अहिल्याबाईंचा महेश्वर टाकसाळीतील शिवलिंग असलेला चांदीचा रुपयादेखील प्रसिद्ध आहे. अहिल्याबाईंनी येथे लोकांच्या वसाहतीबरोबर अर्थ आणि धर्माची भक्कम बैठक बसवून दिली. अशाप्रकारे, महेश्वरचा विकास झाला आणि एका कसब्याचे नव्या राजधानीत रुपांतर झाले. मध्य भारतात त्यांच्या या 32 वर्षीय कारकीर्दीत कधीच दुष्काळ पडला नाही.
अहिल्याबाईंचा 50 पेक्षा अधिक वर्षांचा सहवास लाभलेले भारमलदादा होळकर यांनी सर जॉन मॅलकम यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी बरीच माहिती दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या सूर्योदय होण्यापूर्वी एक तास आधी उठत, आपल्या सकाळच्या प्रार्थना म्हणत आणि परंपरागत समारंभात सहभागी होत. त्यानंतर, त्या अंबादास पुराणिकांकडून ठराविक काळासाठी पुराण ऐकत, भिक्षा देत आणि अनेक ब्राह्मणांना जेवू घालत. या भोजनाच्या वेळी, त्या स्वतः जातीने उपस्थित राहात असत. यानंतरच, त्या शाकाहारी अन्न ग्रहण करत असत. त्यांनी मांसाहाराचा त्याग केला होता. भोजन झाल्यावर त्या थोडा काळ विश्राम करत. मग तयार होऊन दुपारी 2 वाजता दरबाराच्या कामकाजासाठी हजर राहात. हे काम संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चाले. त्यानंतर, पुन्हा दोन ते तीन तास त्या आपल्या धार्मिक कार्यात मग्न होत. पुन्हा रात्री 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत त्या सरकारी कामात लक्ष घालत आणि मगच आपल्या कक्षात निजायला जात. महेश्वराला आजदेखील कोटीलिंगार्चनाचा विधी रोज सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते पार पडतो आणि या दरम्यान, तयार केल्या गेलेल्या लहान मातीच्या शिवलिंगांची लाकडी पाटावर विधीवत पूजा झाल्यावर, त्यांचे रीतसर नर्मदा नदीत विसर्जन होते.
नाथोबा फणसे हे त्यांची कन्या मुक्ताबाई व सरदार यशवंतराव फणसे यांचे चिरंजीव व होळकर गादीचे शेवटचे उत्तराधिकारी होते. मालेरावांच्या मृत्यूनंतर, या लहान मुलाला त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून दत्तक घ्यायचे होते. सर जॉन मॅल्कम आपल्या ‘मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया’मध्ये लिहितात की, नाथोबा वयात आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडून, दि. 15 डिसेंबर 1787 रोजी त्यांचे महेश्वर येथे निधन झाले. पुढे सरदार फणसे मरण पावल्यावर मुक्ताबाई आणि त्यांच्या पतीच्या दुसर्या पत्नीने त्यांच्या प्रेतासह सती जाण्याची इच्छा जाहीर केली. अहिल्याबाईंनी आपल्या मुलीचा हा कठोर निर्णय बदलण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मुक्ताबाई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. मुक्ताबाई गेल्यावर त्या तीन दिवस दुःखात होत्या. नंतर, त्यांनी आपल्या जावई आणि मुलीच्या स्मरणार्थ महेश्वर येथे फणसे घाटाजवळ, एक सुंदर छत्री तयार केली. अहिल्याबाईंनी ऑगस्ट 1795 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी फेब्रुवारी 1795 मध्ये ही वास्तू बांधून पूर्ण केली. भारतामधील त्यांच्या शेवटच्या वास्तुप्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. अहिल्याबाईंच्या मृत्यूपश्चात यशवंतराव (प्रथम) होळकर हे होळकर घराण्यात इंदूरचे पहिले अभिषिक्त राजे बनले. अहिल्याबाईंविषयी मनात प्रचंड प्रेम व आदर असलेल्या यशवंतरावांनी त्यांचा आदर्श आपल्या मनात कायम ठेवला आणि महेश्वर येथे त्यांची भव्य छत्री उभारली. महेश्वर येथील हे स्मारक आपल्याला अहिल्याबाईंची आठवण करून देणारे जरी असले, तरी ते कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही संकटाला सामोरे जात असताना हार न मानता, निर्भय व निस्वार्थपणे, आपले कर्तव्य पार पाडण्याची शिकवण देणारे देखील आहे.
संदीप दहिसरकर
(लेखक पुरातत्वशास्त्र, इतिहासतज्ज्ञ आहेत.)