भविष्यात वारा कुठल्या दिशेने वाहत आहे, याची चाचपणी शेअर बाजारात केल्यास बाजाराचे अर्थचक्र समजून घेण्यास निश्चितच मदत होते. यापूर्वी बाजारात अनेक प्रकारचे, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्स दाखल झाले. परंतु, एक मुद्दा अजून तसा दुर्लक्षित आहे, ते म्हणजे ’तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग’ याच मुद्याचा आढावा घेणारा हा लेख...
तंत्रज्ञान ही ‘काळाची जननी’ म्हणण्यापेक्षा तंत्रज्ञान हे काळाचे ’सार’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काळ बदलत असतो. काळाप्रमाणे आपल्यालाही बदलावे लागते. विशेषतः शेअर बाजारात तुम्हाला बदलणे भागच पडते. निसर्गाच्या या नियमाने शेअर बाजारात खेळल्यास गुंतवणूक सोपी होते. १९व्या शतकाच्या अखेरपासून अनेक प्रकारच्या ’स्क्रिप’ बाजारात येत असतात. मग त्या एफएमसीजी, इंडस्ट्रीयल, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, मेटल, अभियांत्रिकी व इतर प्रकारचे समभाग हा नेहमी चर्चेचा विषय ठरतात. परंतु, ’तंत्रज्ञान’ हे चर्चेत थोडेफार असले, तरी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या प्रवेशानंतर त्यावर जास्त चर्चा अपेक्षित आहे, परंतु ती तशी झालेली दिसत नाही.
अमेरिकेत नुकतीच जागतिक मंदीची लाट येत असल्याची कथित चर्चा चालू असली, तरी अमेरिकेतील शेअर बाजारात या वावटळीतही आयटी शेअर्सने चांगली कामगिरी केलेली दिसते. किंबहुना, अमेरिकेत पहिल्यांदा गुगलने गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला. हे असे नेमके का होत आहे? त्याचा संदर्भ देणे महत्त्वाचे ठरेल. जगात सगळीकडे ‘एआय’चा वापर वाढू लागला आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर ‘एआय’चा वापर वाढत आहे. त्यातून नवनवीन अॅप्लिकेशन्सचा जन्म होत आहे. त्यावर नवीन उत्पादने घेऊन कंपन्या बाजारात येत असतात. एकदा कंपनी नोंदणीकृत झाली की, भविष्यातील गरज पाहता कंपनीचा ‘रिसर्च-डेव्हलपमेंट’ विभाग हिरिरीने काम करतो व विविध सुविधा पुरवतो. कालांतराने गुंतवणुकीत वाढ झाल्याने कंपनीला अजून हुरूप येतो. पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या कमाईत भर पडते, हे सगळे कालचक्र सुरू राहते.
पण, महत्त्वाचे हे ठरणार आहे की, तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग येणार्या काळात काय भूमिका पार पाडतील? तर वैयक्तिकपणे मला वाटते की, येणारा काळ हा तंत्रज्ञान समभागांचा असणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्येक क्षेत्रातील ‘एआय’चे अॅप्लिकेशन्स वाढल्याने माणूस करत असलेल्या कामकाजातील एकूण ३0 ते ४0 टक्क्यांनी ‘एआय’ माणसाला पर्याय ठरू शकतो. वाढलेल्या स्मार्टफोन, सेमीकंडक्टर, आयटी, संगणक, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, ‘एआय’ या सगळ्यांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने बाजारात या उत्पादनांची मागणी वाढत आहे. खासगी गुंतवणूकदार, व्हेंचर गुंतवणूकदार या क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना महत्त्व देत असल्याने या समभागांची मागणी वाढलेली आहे.
भारताबाबत सांगायचे झाल्यास, २0१८ मध्ये भारताने ‘एआय’वरील गुंतवणुकीत ६६५ डॉलर्स खर्च केले होते. २0२५ पर्यंत भारताकडून ११७८ युएस डॉलर्स इतका ‘एआय’वर खर्च होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना शेअर बाजार मागे कसा पडेल? गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारातील तंत्रज्ञान समभागांच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळाला आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, ‘एआय’ कंपन्यांचा वाटा अर्थव्यवस्थेत ९५७ अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो. शेअर बाजारात पहिल्या दहा कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांना ३0 ते ४0 टक्के सरासरी परतावा दिलेला आहे. हा आकडा अजून संख्येने वाढू शकतो.
विशेषतः ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेनंतर, कोविड काळानंतर डिजिटल सर्व्हिसेस उपभोगात व मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारातील गरज लक्षात घेता, मोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान विभागातील समभागात आपले लक्ष केंद्रित केले. बाजारातील विश्लेषण करणारेदेखील तंत्रज्ञान विभागातील समभागाला महत्त्व देऊ लागले आहेत. जोडीला फिनटेक, ‘एआय’ कंपन्यांनी बाजारात मोठी उलाढाल सुरू केली आहे. भारतातील डिजिटलायझेशनचा वेग पाहता, तंत्रज्ञान विभागातील समभागांची वाढती मागणी ही आपल्या लक्षात येऊ शकते. ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ या समभागांचा गाभाच तंत्रज्ञान क्षेत्रातील उभारणीवर आहे.
उदाहरणार्थ, एका वृत्तानुसार ‘कायनेस इंडिया’ या कंपनीने आपल्या शेअर्समध्ये एका वर्षात दीडशे टक्क्यांनी परतावा दिला आहे. भारतातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात आगामी वर्षात २0 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विशेषतः या प्रकारचे समभाग हे ’भविष्य’ असल्याने अनेक परदेशी कंपन्यांनी या प्रकारच्या समभागात मोठी गुंतवणूक सुरू केली. इतर प्रकारच्या समभागात वाढ होत असली, तरी त्याला एक प्रकारची मर्यादा आहे. परंतु, तंत्रज्ञानाच्या युगात याहून दिवसेंदिवस नवीन शोध लागण्याची शक्यता असल्याने बाजारातील संधी कायम आहेत. अनेक कंपन्या आपले बाजार भांडवल वाढवत असताना, तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीधंद्यात वाढ होत आहे.
विशेषतः तंत्रज्ञानात ‘एआय’, डिजिटल अॅडव्हर्टाईज, फिनटेक, ड्रोन, डिफेन्स तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर या उत्पादनांची गरज वाढलेली आहे. भारत ‘आत्मनिर्भर’ होत असल्याने देशांतर्गत या उत्पादनातील मागणीत वाढ झाल्यामुळे उत्पादनांतही कालांतराने वाढ झाली आहे. भविष्यात या तंत्रज्ञान शेअर्समधील परतावा यावर अवलंबून असल्याने भारताने ’मिशन टेक’ आखले आहे. ई-कॉमर्ससाठी मूलभूत सुविधांचे जाळे उभारणे हे नवीन सरकारच्या १00 दिवसांतील महत्त्वाचे काम ठरणार आहे. यातून आपल्याला तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होऊ शकते. भविष्यात सर्वाधिक गुंतवणुकीवर परतावा देण्याची क्षमता तंत्रज्ञान समभागात असताना त्यातील महत्त्व हवे तितके भारतीय बाजारात स्पष्ट झालेले नाही. आगामी काळात यातील गुंतवणूक वाढल्यास जगभरातील अनेक गुंतवणूकदार ब्लू चिप्स कंपनीप्रमाणे महत्त्व तंत्रज्ञान शेअर्सला देतील, अशी दाट शक्यता आहे. अर्थात, याला मर्यादाही आहेत, त्याबद्दल आपले दुमत नसेल. मात्र, टेक शेअर्सचे मूल्यांकन घटले तरी पुढील वाढ तंत्रज्ञान समभागांमुळेच होऊ शकते.
भविष्यात इलेक्ट्रिक वाहन, स्कूटर याप्रमाणे स्वदेशी उत्पादनांत वाढ केल्याने भारताच्या तंत्रज्ञान समभागात पर्यायाने वाढ होणार आहे. उदाहरणार्थ,आजच टीव्हीएस स्कूटरच्या विक्रीत २५ ते २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यातील क्लाऊड कॉम्प्युटिंग, इतर तंत्रज्ञान वापरून भारतात ‘टेक इकोसिस्टीम’ होण्यास निश्चितच याचा लाभ भारतवासी गुंतवणूकदारांना होणार आहे.
याविषयी आम्ही ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ’‘लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील तेजी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्पादनातील प्रभाव पाहायला मिळू शकेल. उदाहरणार्थ संरक्षण, अंतराळ, एअरोस्पेस, एक्सपलोजिव्ह, जहाज बांधणी, ड्रोन, बुलेट ट्रेन या सर्व क्षेत्रांतील उत्पादन, डिझायनिंग करणार्या खासगी व सरकारी कंपन्या तसेच संगणक क्षेत्रातील अतिउच्च कपॅसिटीच्या हार्डवेअर सर्व्हर बनविणार्या कंपन्या तसेच सर्व उच्च तंत्रज्ञान भारतात येतील. त्या कंपन्यांसाठी लागणारे सर्व काही अशा अनुषंगाने अनेक उत्पादने भारतात येत आहेत, तसेच भारतात बनत आहेत. या सर्व कंपन्यांचा वाटा शेअर बाजारात खूप असणार आहे. या सर्व कंपन्यांवर नजर ठेवून बाजारातील देशीविदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करतील, असे दिसते. त्यामुळेच पुढील भविष्यात नवीन थीमवर बाजार स्वार होईल, हे पाहणे महत्त्वाचे राहील.”
यावर प्रतिक्रिया देताना ‘जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस’चे ‘रिसर्च एनालिस्ट’ विनोद टीपी म्हणाले की, ’‘भारतीय आयटी सेवा उद्योग आर्थिक परिस्थिती आणि चलनवाढीच्या वाढत्या चिंतांमुळे नजीकच्या काळात मध्यम महसूलवाढ सुरू ठेवण्यास तयार आहे. तथापि, खर्च कमीत कमी करण्याच्या उपायांसह ऑपरेटिंग नफ्यात सुधारणा अपेक्षित आहे. या अडचणी असूनही, गंभीर खर्च आणि खर्च ऑप्टिमायझेशन सौदे सुरूच आहेत. म्हणून, आमची भूमिका तटस्थ राहते. परंतु, दीर्घकालीन रूपयाचा विनिमय दर या क्षेत्रावर लक्षणीय प्रभाव टाकू शकतो. रुपयामुळे निर्यात करणार्या कंपन्यांना फायदा होतो. अमेरिका आणि युरोपच्या संपर्कात आलेले, अनेकदा चलनवाढीच्या काळात स्थिर महसूल टिकवून ठेवतो, जेव्हा रुपया घसरतो.”
‘मॅक्रो हेडविंड्स’च्या चिंतेमुळे अस्थिरतेची शक्यता लक्षात घेता, नजीकच्या काळात, उच्च-गुणवत्तेच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करणे उचित आहे, विशेषत: जे विशिष्ट क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, जे मजबूत महसूलवाढ दर्शवू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, संचय धोरण अवलंबण्याची शिफारस केली जाते. मजबूत ताळेबंद असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे, विशेषत: ‘एआय’ आणि ‘ॠशप -ख’ तंत्रज्ञानामध्ये सामील असलेल्या मजबूत डील जिंकणार्या आणि विविध क्षेत्रांमध्ये वैविध्य आणून उपहास करणार्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे, ही एक चांगली निवड असू शकते.
याविषयी प्रतिक्रिया देताना ‘मोजो पीएमएस’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील दमानिया म्हणाले की, ’‘सध्याच्या लँडस्केपमध्ये, मोठ्या आयटी कंपन्या अनिश्चितता आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे सावध भूमिका स्वीकारत आहेत. बाजाराच्या विश्लेषणातून विवेकी खर्चासाठी एक थंड वातावरण दिसून येते. ग्राहक रोख बचत करताना तत्काळ नफा मिळवून देणार्या प्रकल्पांना प्राधान्य देत आहेत. परिणामी, मजबूत आयटी क्षेत्रातील वाढ अपेक्षित नाही, भू-राजकीय तणाव असूनही, भारतीय रुपयाचे अवमूल्यन होणार नाही.”
आयटी क्षेत्राने अंदाजे सहा टक्क्यांची घसरण अनुभवली. ही घसरण प्रामुख्याने व्यवसायाच्या दृष्टिकोनाबद्दलच्या चिंतेमुळे आहे. तथापि, गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्याच्या किमतीमध्ये अनेक नकारात्मक घटक आधीच आहेत. जरी अनेक आव्हाने कायम असली, तरी काही सकारात्मक घटकांचा विचार केला पाहिजे. प्रथमतः, पुरवठा-बाजूच्या समस्या कमी केल्या गेल्या आहेत, ज्यायोगे ‘अट्रिशन’ दरांमध्ये तीव्र घट झाली आहे, ज्यामुळे कर्मचार्यांच्या खर्चात किमान वाढ झाली आहे.
मूल्यमापनाचा विचार करताना, केवळ काही कंपन्या समृद्ध मूल्यमापनावर व्यापार करत आहेत, जे मर्यादित नकारात्मक जोखीम दर्शवितात. एकूणच बाजारातील भावना नकारात्मक झाल्यास, मजबूत व्यवस्थापन, मजबूत ताळेबंद आणि उच्च कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानके यांच्यामुळे आकर्षित होऊन गुंतवणूकदार आयटी क्षेत्रासारख्या सुरक्षित क्षेत्राकडे जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे या क्षेत्राला नजीकच्या काळात काही सुधारणांचा अनुभव येऊ शकतो, परंतु मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन उत्कृष्ट राहील.
अनुमान - भावी काळात तंत्रज्ञान विभागातील समभागांचा खूप मोठा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. या क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेता यात अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते. भविष्यात त्या प्रकारची पोषक धोरणे असल्यास भारतातील अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान विभागातील कंपन्यांचा मोठा हातभार असणार आहे.
-मोहीत सोमण