मी दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते : चंद्रकांत खैरे
16-Mar-2024
Total Views | 287
छत्रपती संभाजीनगर : मी अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. यावर आता खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, "मी अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते. मी त्यांना घेऊन चालायचो. त्यावेळी माझे पदाधिकारी चिडायचे. तुम्ही त्यांचंच ऐकता असं म्हणायचे. अंबादास दानवे लहान आहेत. माझे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करावी लागेल."
"मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे. मी एकनिष्ठ शिवसैनिक असून कुठेही जाणार नाही. मागच्या वेळी माझा पराभव झाल्यानंतरही मी एक दिवसही घरी राहिलेलो नाही. तेव्हापासून आजपर्यंत मी पाच वर्षे काम केलं. लोकांनी मला खासदार म्हणूनच वागणूक दिली," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अंबादास दानवेंचा गुरु मीच आहे. ते माझे शिष्य आहेत. आम्ही सगळे एकाच कुटुंबातील आहोत. आमची काहीही नाराजी नाही. मी कधीही एकांगी निर्णय घेत नाही. पण शिवसेना स्थापन झाल्यापासून मी काम करत असल्याने माझा तेवढा अधिकार आहे. मला वाटत नाही दानवे कुठेही जातील. त्यांना तिकीट मिळालं तरी मी पक्षाचा आदेश मानतो. पण तुम्हीच उमेदवार राहायला हवं, अशी माझ्या मतदारांची मागणी आहे. मला अनेकांनी फोन केले, पण मी कुठेही गेलो नाही. मी शिवसेनाप्रमुखांना सोडलं नाही. माझ्या विरोधात कितीही मोठा माणूस उभा राहिला तरी त्याला कसं पाडायचं हे मला माहिती आहे," असेही ते म्हणाले आहेत.